Simhastha Kumbh Mela Nashik File Photo
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी आखाड्यांमध्ये दुफळी; शैव साधूंचे दोन गट आमनेसामने

Nashik Simhastha Kumbh Mela | त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांमध्ये पडले दोन गट

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
येथील १० आखाड्यांमध्ये विसंवाद असल्याचे यापूर्वी वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. आखाडा परिषदेत दोन गट निर्माण झाले असून, शैव साधूंच्या १० आखाड्यांतील ५ आखाडे एका बाजूला आणि दुसरे पाच आखाडे विरोधात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याचे पडसाद नुकत्याच एका आखाड्यात झालेल्या महाप्रसाद भंडाऱ्यात उमटले.

आखाडा परिषदेत मतभेद असतील, मात्र आजपर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये ते उघड झाले नव्हते. कोणताही उत्सव असेल, तर सर्व आखाड्यांचे साधू - महंत एकत्र येतात, असा अनुभव होता. मात्र, नुकत्याच झालेल्या भंडाऱ्यात काही आखाड्यांच्या साधूंची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवली. याबाबत अधिक माहिती घेतली असता त्या आखाड्यांच्या साधूंना निमंत्रित केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावर निरंजनी आखाड्याचे डॉ. रवींद्र पुरी आणि महानिर्वाणी आखाड्याचे रवींद्र पुरी यांनी दावा केलेला आहे. यात निरंजनी आखाड्याचे रवींद्र पुरी हे मागील ६ वर्षांपासून अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आहेत. सुरुवातीला त्यांच्या समवेत सर्व १३ आखाडे होते. तथापि हरिद्वार येथे २०२१ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यापासून दुसरा गट निर्माण झाला आहे. याचे पडसाद प्रयागराज कुंभमेळ्यात उमटले होते.

हरिद्वार येथे झालेल्या अर्धकुंभ नियोजनात उमटले आहेत. महानिर्वाणी आखाड्याचे रवींद्र पुरी महाराज यांनी त्यांच्या सोबत महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, बडा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाडा आणि निर्मल आखाडा असे त्र्यंबकेश्वर येथील पाच आखाडे आणि नाशिक येथील तीन वैष्णव आखाडे असल्याचा वारंवार पुनरुच्चार केला. आपल्यासमवेत आठ आखाडे असून, दोनचे बहुमत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

निरंजनी आखाड्याचे डॉ. रवींद्र पुरी महाराज यांनी निरंजनी आखाडा, जुना आखाडा, आनंद आखाडा, आवाहन आखाडा आणि अग्नी आखाडा असे पाच आखाडे आहेत. त्याव्यतिरिक्त तीन आखाड्यांचे काही महंत आमच्यासोबत आहेत व आम्ही बहुमतात आहोत, असे सांगत आहेत.
आखाडा परिषदेच्या वादाचे पडसाद हरिद्वार अर्धकुंभमध्ये उमटतील असे दिसते. त्र्यंबकेश्वर व नाशिक कुंभमेळ्यातही यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

नाशिक येथे फक्त वैष्णव आखाडे स्नान करतात त्यामुळे तिथे विशेष काही फरक पडणार नाही. मात्र, त्र्यंबकेश्वरला स्नान करणाऱ्या शैव साधूंच्या आखाड्यांचे दोन गटांमध्ये विभाजन झाल्यामुळे व्यवस्थेवर ताण निर्माण होणार आहे. नियोजन करताना शासन यंत्रणेची कसोटी लागणार आहे. कुंभमेळ्यात वाद निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागेल असे दिसते.

आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शैव आखाड्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. या स्पर्धेत दोन्ही गटांसोबत पाच आखाडे उभे आहेत. दि. ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. त्यावेळी या दोन गटांत असलेला संघर्ष व त्याचे निर्माण होणारे परिणाम स्पष्ट होतील. त्यावेळी कुंभमेळा प्राधिकरण कसे नियोजन करणार याकडे साधू - महंतांचे लक्ष लागले आहे.

मागील दोन कुंभमेळ्यांतही वाद

१९९१ च्या कुंभमेळ्यात शासनाने निमंत्रण पत्रिकेत चौथे शाही स्नानपर्व प्रसिद्ध केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. अखेर श्रावण अमावास्येचे मुख्य शाहीस्नान झाले नाही. अवघ्या १५ दिवसांमध्ये साधू - महंतांनी त्र्यंबकेश्वरमधून निघून जाने पसंत केले होते. २००३ मध्ये कुंभमेळा उधळला जाण्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, स्थानिकांच्या मदतीने वेळीच परिस्थिती सावरल्याने तसे घडले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT