नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'एसआयआर'च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्राप्त झाली होती. मात्र राज्यातील एक लाख ३६ हजार मतदान केंद्रांपैकी केवळ ९३ हजार मतदान केंद्रांवरच बीएलओंची नियुक्तीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यात कोणतीही दिरंगाई खपवून घेणार नाही.
एसआयआरच्या माध्यमातून बोगस मतदारांवर आक्षेप घेऊन त्यांना मतदारयादीतून वेचून बाहेर फेका, लढाईची वेळ आली की शेपुट घालू नका, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
एसआयआरसंदर्भात भाजपची उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पंचवटीतील स्वामिनारायण मंदिरातील बँक्वेट हॉलमध्ये बुधवारी (दि.१९) झाली. यावेळी एसआयआरच्या पहिल्या टप्प्यातील कामगिरीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
चव्हाण म्हणाले की, बूथच्या बाहेर बसायची सवय सोडून निवडणुकीची लढाई जिंकता येत नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपला मतदार मतदान केंद्रापर्यंत आणणे, तसेच विरोधकांच्या मतदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बूथनिहाय सक्षम यंत्रणा उभी करा.
पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे, असे चव्हाण यांनी सुनावले. ज्या मतदारसंघांमध्ये संघटनात्मक काम अद्याप अपूर्ण आहे, त्या ठिकाणी बैठका घेऊन आढावा घेणार आहे.
२४ तारखेनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढाईच्या दृष्टीने कार्यकारिणीपासून बूथस्तरापर्यंतची यंत्रणा अधिक सक्रिय करण्यावर भर दिला जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले. बूथनिहाय जबाबदारी निश्चित करून कार्यकर्त्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आक्रमकपणे काम करावे, असा संदेशही या बैठकीत दिला.
यावेळी राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग, एसआयआर प्रभारी भगवानदास सबनानी यांनीही एसआयआरसंदर्भात मार्गदर्शन केले. व्यासपीठावर किरीट सोमय्या, राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री गिरीश महाजन आदींसह उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग यांनी एसआयआरसंदर्भात पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बूथनिहाय कामकाज अधिक सक्षम करण्याच्या सूचना देताना आपल्याकडून नेमके कुठे कमी पडतो, यावर लक्ष केंद्रित करून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. एसआयआरचा दुसरा टप्पा २४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. शनिवारी, रविवारी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी बूथवर हजर राहून मतदारांच्या त्रुटी दूर कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
एसआयआरच्या माध्यमातून बांगलादेशी, पाकिस्तानींना शोधून काढा, असे आवाहन एसआयआर प्रभारी भगवानदास सबनानी यांनी केले. ७ नंबर फॉर्मद्वारे ज्या मतदारांनी एसआयआर नोंदणी केली, ते बांगलादेशी, पाकिस्तानी असू शकतात. त्यांचा शोध घेऊन त्यांना मतदारयादीतून बाहेर काढावे लागेल. ८ नंबरच्या फॉर्मद्वारे नोंदणी करावी लागेल. यासाठी बूथ लेव्हलला सखोल काम करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.