बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
सुरगाणा तालुक्यातील मनखेड ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन अंतर्गत मनखेड, वांजूळपाडा, आंब्याचापाडा, भाटविहीर, जायविहीर व कवेली या गावांमध्ये योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः महिलांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. मनखेड, आंब्याचापाडा, भाटविहीर आणि कवेली या गावांत पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. मनखेड येथील विहिरीवरील वीजपंप बंद पडल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे.
पंप सुरू केला तरी १० ते १५ दिवसांत पुन्हा पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मनखेड गावातील दोन हातपंपांपैकी एक हातपंप नादुरुस्त असल्याने उर्वरित एका हातपंपावर महिलांची मोठी गर्दी होत असून, रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी रांगा लागत आहेत.
रानपाडा तलावात कमी पाणीसाठा असल्याने नदीला पुरेसा प्रवाह मिळत नाही. नदीपात्रात सुमारे तीन किलोमीटर अंतरात सीसीबी व केटी बंधाऱ्यांची उभारणी न झाल्याने जलसंधारणावर गंभीर परिणाम झाला आहे. सुमारे २२०० ते २३०० लोकसंख्या असलेल्या मनखेड गावात बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असली तरी मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.
पाणी लाभ नाही
भाटविहीर आणि आंब्याचापाडा येथे विहिरींत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही जलजीवन योजना सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नाही. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. कवेली येथे योजना सुरू असली तरी विहिरीतील पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने नियमित पुरवठा होत नाही.
जर आठ ते दहा दिवसांत पाणीप्रश्न मार्गी लागला नाही तर ग्रामपंचायतीपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल. पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढणार.जयराम भोये, उपसरपंच, मनखेड