सिन्नर : राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला, शेतकरी, मजूर, उद्योजक, कष्टकरी व जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्थसंकल्प मांडल्याची टीका विरोधकांकडून होत असून, लाडकी बहीण योजना फसवी असल्याचे नरेटिव्ह सेट केले जात आहे. तथापि अजित पवार शब्दाला पक्के असल्याने त्यांनी जाहीर केलेल्या योजना पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. खोटे नरेटिव्ह सेट करून लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने विरोधकांनी हुरळून जाऊ नये, विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील अपयशाची सव्याज परतफेड करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे भाषण सुरू असताना आमदार कोकाटे यांच्या विकास कामांच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी कार्यकत्यांकडून घोषणांद्वारे करण्यात आली. त्यावर खा. तटकरे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत माणिकरावांना लाखाचे मताधिक्य द्या, त्यांना नक्कीच मंत्रिपद देऊ, अशी ग्वाही दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऑगस्ट महिन्यात 'जनसंवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी 'सन्मान यात्रा' काढली असून, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, गौरव गोवर्धन, योगेश मिसाळ, माजी जि. प. सदस्या सीमंतिनी कोकाटे, नरेश अरोरा आदींसह मान्यवर उपस्थित होते.
राज्याला विकासाच्या पथावर घेऊन जाण्यासाठी अजित पवार यांनी केलेल्या कामांची, राबविलेल्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणारी जनसन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी बंधुत्वाची जबाबदारी म्हणून आपण सन्मान यात्रा काढली असून, जनसन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन तटकरे यांनी केले. सीमंतिनी कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. तर नरेश अरोरा यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराबाबत मार्गदर्शन केले.
कार्यकत्यांनी मतभेद बाजूला ठेवून सत्ता मिळवणे हेच ध्येय समोर ठेवून राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री बनविण्यासाठी केवळ सिन्नरच नाही तर राज्यभर कार्यकत्यांनी काम करावे, असे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.
अर्थसंकल्पात मातृशक्तीला आणि वारकऱ्यांना दिलासा देण्यात आल्याचे सांगत यापूर्वी राज्यात अनेक यात्रा काढण्यात आल्या. मात्र, ही जनसन्मान यात्रा आम्ही लोकांसाठी काय केले हे सांगायला काढणार असल्याचे महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नमूद केले.