नाशिकरोड: ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्याच्या बाजारात कारले आणि दोडके या भाज्यांनी चांगलाच भाव घेतला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आकडेवारीनुसार कारले 4 हजार 583 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्रीस गेले, तर दोडक्यानेही कारल्याची बरोबरी करत उच्चांकी दर गाठला आहे.
याचबरोबर वांगी सुमारे 3 हजार 500 रुपयांहून अधिक दराने, तर गिलके 2 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्रीस गेले. परिणामी किरकोळ बाजारात कारले 70 ते 80 रुपये किलो, दोडके 65 ते 70 रुपये किलो, तर गिलके 55 ते 60 रुपये किलो दराने विकले जात आहेत.
सध्या आवक सर्वच भाज्या कमी झाल्या असल्या, तरी काही भाज्यांचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने दर कमी जास्त होत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली, तर उन्हाळ्यात आरोग्यदायी गुणधर्मांमुळे या भाज्यांची मागणी वाढत असल्याने इतर भाज्यांच्या तुलनेत कारले व दोडके महाग विकले जातात, अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली.
उन्हाळ्यात बीपी व शुगरच्या रुग्णांसाठी कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त आहे. तसेच दोडक्याची भाजी किंवा रस घेतल्यास शरीर थंड राहण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी या भाज्यांचा समावेश आहारात करावा.डॉ. तस्मिना शेख, आयुर्वेद तज्ज्ञ