नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे फुटले अशा चर्चा उठल्या होत्या. त्यावर आमदार खोसकरांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे. त्यामध्ये त्यांनी, पक्षाच्या सूचनेनुसारच आपण मतदान केले आहे, पक्षश्रेष्ठींनी याबाबत चौकशी करावी, आणि जे खरेच फुटले आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
पहिली पसंती मिलिंद नार्वेकर, दुसरी जयंत पाटील आणि तिसरी प्रज्ञा सातव असे मी मतदान केले आहे. मी व्यवस्थित मतदान केलेले आहे. माझी बदनामी सुरु आहे ती चुकीची आहे. जे काही आमदार फुटलेत त्यांच्यावर कारवाई करावी. माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर अन्याय केला जातो आहे. चौकशी करा, मात्र पहिले माझे मतदान चेक करून बघा. भले माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण त्या पूर्वी माझे मतदान चेक करा, असे हिरामण खोसकर यांनी म्हटले आहे.
आ. खोसकर म्हणाले की, मी विधान परिषद निवडणुकीत कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. कोणत्या आमदाराने कुणाला मतदान करायचे, हे पक्षाने आधीच ठरवले होते. काँग्रेसची सात मते मिलिंद नार्वेकरांना आणि उर्वरित मते शेकापच्या जयंत पाटलांना द्यायचे ठरले होते. त्या पद्धतीने एकत्र जाऊन मतदान केले. त्यावेळी ठरल्यानुसार उद्धव ठाकरे यांचे १६ व आमचे सात अशी २३ मते होतात. आता एक मत कुणाचे फुटले हे कोर्टाकडून आदेश घेऊन चेक करावे. पण गेल्या दोन दिवसांपासून माझी बदनामी सुरू आहे. त्याची दखल घेऊन वरिष्ठांनी ती तातडीने थांबवावी, अशी विनंती आमदार खोसकर यांनी केली.
आ. खोसकर यांनी, मी पहिल्या पसंतीचे मतदान नार्वेकरांना केले. त्यानंतर जयंत पाटील व प्रज्ञा सातव यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीची मते दिली. मी व्यवस्थित मतदान केले. त्यानंतरही माझी सुरू असलेली बदनामी चुकीची आहे. पक्षाने जे आमदार फुटले, त्यांच्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.