नाशिक

..तर आमच्याइतके नालायक आम्हीच! आ. कोकाटे यांचे आ.रोहीत पवारांना प्रत्युत्तर

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील महायुतीचे अनेक आमदार महाविकास आघाडीकडे जाण्यास इच्छूक असल्याच्या चर्चांना राज्यभरात उत आला होता. यामध्ये "अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू…. " तसेच आमच्या पैकी कोणीच अजित पवारांना सोडून जाणार नसल्याचा दावा आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १८ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाला अवघी एक जागा मिळाली. अजित पवारांनी केलेल्या बंडावर जनता नाराज असल्याचे यामधून सिद्ध झाले असल्याचा प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यातच आमदार रोहीत पवार यांनी राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असल्याची माहिती दिली होती. यालाच आमदार कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोकाटे म्हणाले की, अजितदादा यांना सोडून जाण्यासाठी एक तरी कारण पाहिजे. सिन्नरच्या विकासासाठी जेवढे पैसे अजित पवार यांनी दिले आहेत, तेवढे पैसे एकाही सरकारनं दिले नाहीत. अजित पवार यांना आमदार सोडून जाणार या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. अतिशय सोयीस्कर रित्या हे पसरवले आहे. परवा झालेल्या बैठकीत अजित दादा यांच्यासोबत राहण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. रोहित पवार यांचं वक्तव्य म्हणजे, राजकीय डाव असू शकतो. एकाही आमदारानं त्या अनुषंगानं माझ्यासोबत चर्चा केलेली नाही. अजित दादांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT