नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या संगम पूल - मिर्ची हॉटेल चौक - अमृतधाम चौक गुंजाळबाबा चौक - तारवाला चौक- मार्केट सिग्नल ते मखमलाबाद रोड (घाटाकडे जाणारा रस्ता / साधुग्राम पोहोच मार्ग) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या ट्रायल पॅचमध्ये तडे गेल्याचे आढळले आहे. त्यामुळे संबंधित ट्रायल पॅच निकषांमध्ये अपयशी ठरला असून, पावसाळ्यानंतर तो काढून नव्याने डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या कामांतर्गत दि. १३ जुलै २०२६ रोजी गुंजाळबाबानगर येथे डीबीएम या डांबरमिश्रित थराचा टेस्ट / ट्रायल पॅच करण्यात आला होता. या प्रक्रियेत हॉट मिक्स प्लांटमधून आणलेल्या डांबरमिश्रित साहित्याचे अंथरण करून रोलिंग पॅटर्नची निश्चिती केली जाते. ट्रायल पॅच सर्व तांत्रिक निकष पूर्ण केल्यानंतरच उर्वरित कामाला परवानगी दिली जाते. मात्र, ट्रायल पॅचवर रोलिंग केल्यानंतर त्यामध्ये तडे गेल्याचे निदर्शनास आले.
सविस्तर तपासणीत हा ट्रायल पॅच आवश्यक निकष पूर्ण करीत नसल्याचे स्पष्ट झाल्याने तो काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जॉब मिक्समधील अॅग्रीगेटचे प्रमाण बदलून सुधारित डीबीएम साहित्य तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत १४ जुलै रोजी आयआयटी मुंबईकडे तातडीने तांत्रिक मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
दरम्यान, त्यानंतर लगेचच पाऊस सुरू झाल्याने संबंधित ट्रायल पॅचवर सील कोट अथवा बीसी थर देता आला नाही. तसेच खराब झालेला भाग काढून टाकणेही शक्य झाले नाही. तांत्रिकदृष्ट्या डीबीएमचा थर झाल्यानंतर त्यावर सील कोट किंवा बीसी थर दिल्याशिवाय वाहतूक सुरू करता येत नाही. मात्र पेठ रोड व दिंडोरी रोडवरील वाहतुकीचा मोठा ताण लक्षात घेता या मार्गावर एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू ठेवावी लागली. त्यामुळे ट्रायल पॅचवरून वाहने सुरू झाल्याने डीबीएम थराचे रॅव्हलिंग आणि काही प्रमाणात अॅग्रीगेट स्ट्रिपिंग झाल्याचे निदर्शनास आले.
आयआयटी मुंबईचे पथक करणार पाहणी
रस्त्याचा पृष्ठभाग कोरडा झाल्यावर आरएस-१ इमल्शनद्वारे तात्पुरता सील कोट करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ पथक लवकरच प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. पावसाळा संपल्यानंतर खराब झालेला डीबीएमचा थर मक्तेदाराकडून स्वखर्चाने काढून त्या ठिकाणी नव्याने आणि तांत्रिक निकषांनुसार डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.