आला श्रावणमास (भाग १)
नाशिक : अंजली राऊत
हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावणमासाला गुरुवार (दि. १३) पासून सुरुवात होत आहे. महिनाभर विविध धार्मिक व्रतवैकल्ये, पूजाअर्चा आणि उपासना केली जाणार आहे. श्रावण महिन्याला सुरुवात होताच उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. उपवासासाठी फराळाच्या दरात वाढ झाली आहे.
साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, बटाटा, शिंगाडा व राजगिरा पीठ या पदार्थांच्या किमती वाढल्याने यंदा उपवासाचा फराळ महागला आहे. त्यामुळे श्रावणातील उपवासाचे बजेट काहीसे वाढले आहे.
साबुदाणा आणि शेंगदाण्याला वर्षभराच्या तुलनेत श्रावणात अधिक मागणी असते. मागणीच्या तुलनेत काही ठिकाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने किरकोळ बाजारात दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरातील किराणा दुकानांत खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांकडून प्रमाण कमी घेण्याला किंवा आवश्यक तेवढीच खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
आयुर्वेदिक व वैज्ञानिक आकलनानुसार श्रावणातील गारवा व आर्द्रतेमुळे शरीरातील पचनक्रिया म्हणजेच जठराग्नी मंदावतो. यामुळे जड, तेलकट अन्न पचण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे उपवास करताना ताजे आणि सात्विक पदार्थ खावेत. यात साबुदाणा, भगर, उकडलेले बटाटे किंवा रताळे, राजगिराचे लाडू किंवा शिरा, फळे आणि दूध, दही, ताकासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा प्रामुख्याने समावेश करावा.
राजगिरा, शिंगाडे, आरारुट, साबुदाण्याच्या पिठांची पुरी, भाकरी किंवा थालिपीठ बनवून बटाट्याची कढी बनवून ती खाऊ शकतात. हे पदार्थ पोट भरण्यासोबतच उपवासाच्या काळात शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यास मदत करतात. उपवासामुळे या पदार्थांची मागणी वाढली आहे. श्रावणमास श्रद्धेसोबतच उपवासाच्या पदार्थांच्या खरेदी-विक्रीला चालना देणारा ठरत आहे.
साबुदाणा ८० रुपये किलो
शेंगदाणे १६५ रुपये किलो
शिंगाडा पीठ ७० रु. पाव किलो
रताळे १५० रुपये किलो
भगर २२५ रुपये किलो
राजगिरा पीठ ७५ रु. पाव किलो
खजूर १४० ते २०० रुपये किलो
केळी ५० रुपये डझन
"श्रावण सुरू झाल्यापासून घाऊक तसेच किरकोळ किमतीतही वाढ झाली आहे. ग्राहकांना दरवाढीचा फटका बसत असला तरी मागणी कायम आहे. उपवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने फराळाच्या पदार्थांची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे."— स्नेहा पगारे, किराणा व्यावसायिक