नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात जन्मानंतर बाळ न रडल्याने त्याची एसएनसीयू कक्षात तपासणीसाठी नेले. तेथे बाळास मृत घोषित केले. मात्र, शुक्रवार (दि.27) सकाळच्या सत्रात आलेल्या परिचारिकांनी कामकाजास सुरुवात केली असता बाळ जिवंत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळास पुन्हा एसएनसीयू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सांनी चौकशी समिती नेमली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडी परिसरातील त्रिमूर्ती नगर परिसरातील एका महिलेने गुरुवारी (दि.२६) पहाटे बाळास जन्म दिला. बाळाचे वजन सुमारे २३०० ग्रॅम भरले. मात्र, जन्मानंतर बाळाने आवाज न केल्याने त्यास एसएनसीयू कक्षात उपचारासाठी नेले. तेथे तपासणी करून बाळाचा मृत्यू झाल्याचे संबंधितांनी सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बाळास कपड्यात गुंडाळून ठेवत त्याच्या आईला दुसऱ्या कक्षात हलवले. शुक्रवार (दि.27) सकाळच्या सत्रात दुसरे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी कामास सुरुवात केली. त्याचवेळी कपड्यात गुंडाळलेल्या बाळाने आवाज काढल्याने तेथील कर्मचाऱ्यांना धक्का बसला. त्यांनी कापड सोडवून पाहिले असता बाळ जीवंत आढळले. त्यामुळे बाळास तातडीने पुन्हा एसएनसीयू कक्षात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यामुळे नवजात बाळ जन्मल्यानंतर काही वेळाने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत कापडात गुंडाळून ठेवल्याचा प्रकाराची चर्चा जिल्हा रुग्णालयात रंगली आहे. या घटनेची माहिती गुरुवारी दिवसभर वरिष्ठांपर्यंत दिली नसल्याचेही समोर येत आहे. यासंर्दभात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी शुक्रवारी (दि.27) संबंधित डॉक्टर व परिचारिकांकडे चौकशी करीत घटनेची माहिती जाणून घेतली.
बाळाचा मृत्यू झाल्याची नोंद कागदोपत्री केलेली नाही. चौकशीतून बाळाची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. तरीदेखील यासंदर्भात चौकशी समिती नेमली असून पाच दिवसांत अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर घटनेची माहिती स्पष्ट होईल.डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक. नाशिक.