नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीस शासनाने मंजुरी दिली असून, या प्रक्रियेचे अधिकार संबंधित शिक्षण संस्थांना दिले आहेत. तसेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येत्या दोन महिन्यांत राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली.
कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आयोजित समाज दिन कार्यक्रमात ते बोलत होते. मविप्र संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या पाच विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला प्रवास आज महाकाय वटवृक्षापर्यंत पोहोचल्याचे सांगत भुसे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी आदिवासी पाड्याती जिल्हा परिषद शाळेचेही यावेळी कौतुक केले. शिक्षक केशव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरीतील विद्यार्थी एका हाताने मराठी, तर दुसऱ्या हाताने इंग्रजी लिहित असल्याचे तसेच विद्यार्थ्यांना १२०० ते १५०० पर्यंतचे पाढे तोंडपाठ असल्याचे त्यांनी नमूद केले.
चालू शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईसह सर्व अभ्यासक्रमांमध्ये आणि विविध भाषांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास दोन पानांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ७० हून अधिक स्थानिक महापुरुषांचा इतिहास अभ्यासक्रमात आणला जाणार आहे.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे आणि राष्ट्रगीतानंतर 'गर्झा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत म्हणणे बंधनकारक केले आहे. राज्यात कोल्हापूर पॅटर्नसह विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शिक्षण विभागाला एसएमएसद्वारे मिळणाऱ्या सकारात्मक सूचनांचाही विचार केला जाईल, असे भुसे यांनी सांगितले.
शिक्षक भरतीत कला, क्रीडा शिक्षक, माजी सैनिक आणि खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार असून, नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र व क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यासाठी शासन आणि सीएसआर निधीतून सहकार्य केले जाईल. पालकांनी मुलांचा मोबाईल वापर कमी करून दररोज किमान अर्धा ते एक तास संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.