सप्तशृंगगड : रामनवमीपासून सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या चैत्रोत्सवात अश्विन नवमीच्या मध्यरात्री (शुक्रवारी) सप्तशृंग शिखरावर पारंपारिप पद्धतीने मिरवणूक काढत सुमारे 600 वर्षांची परंपरा असलेला कीर्ती ध्वज फडकला. शनिवारपासून या ध्वजाचे भाविकांना दर्शन होईल. दरम्यान, अश्विन नवमीला सुमारे 40 हजार पेक्षा अधिक भाविकांनी देवी दर्शनाचा लाभ घेतल्याचा अंदाज आहे. यावेळी सप्तशृंगी मातेच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता.
येथील गवळी परिवाराला गडावर कीर्तीध्वज लावण्याचा मान असून गेल्या अनेक वर्षापासून हा अदभूत सोहळा पार पाडण्याचे काम या परिवाराकडून सुरू आहे. सकाळी साडेसात वाजता कीर्तीध्वजाची पंचामृत महापूजा देवी संस्थानाचे विश्वस्थ मनज्योत पाटील व विश्वस्त डॉ. श्री. प्रशांत देवरे यांनी सपत्नीक केली. तसेच मानकरी गवळी परिवाराच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. मिववणुकीत देवीचे अलंकार ठेवण्यात आले होते. या सोहळ्याला खान्देश भागासह राज्यभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. दरम्यान, दुपारी ३.३० वाजता देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात मानकरी पूजाऱ्यांसह संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश बी. व्ही. वाघ, उपविभागीय अधिकारी अकुनरी नरेश यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, मानकरी एकनाथ गवळी, विष्णू गवळी, कृष्णा गवळी, काशिनाथ गवळी, आनंदा गवळी, दत्तू गवळी, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर, प्रकाश पगार, प्रकाश जोशी, भिकन वाबळे, पोलिस पाटील शशिकांत बेनके आदी उपस्थित होते.
गडावर कीर्तीध्वज फडकविण्याची परंपरा 600 वर्षापासून सुरू आहे. हा ध्वज फडविण्यासाठी रात्री 12 वाजता शिखरावर जाऊन फडकविला जातो. त्यासाठी 10 फुट लांब काठी, 11 मीटर केशरी कापड, पुजेसाठी गहु, तादुळ, कुंकु, हळद, जाणाऱ्या मार्गात विविध ठिकाणांच्या देवतांसाठी लागणारे पूजा साहित्य, नैवेद्य इत्यादी साहित्य सोबत घेऊन जावे लागते. शुक्रवारी देवी ट्रस्ट कार्यालयात किर्ती ध्वजाची विधिवत पूजा झाल्यानंतर किर्तीध्वज मिरवणुनंतर फडकवण्यासाठी गवळी परिवाराकडे सपुर्द करण्यात आला.