नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बाह्य रिंगरोडसाठी भूसंपादनात बाधित होणाऱ्या महिला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे. या शासन काळात अधिकारी महिलांना मारतात, हा कुठला प्रकार आहे? धर्मध्वज फडकावतात आणि महिलांवर अन्याय करतात.
त्या धर्मध्वजाचे पावित्र्य काय अशा शब्दांत उबाठा नेते संजय राऊत यांनी ताशेरे ओढले. मातोरी व मुंगसरा येथील भूसंपादन अधिकारी पवन दत्ता यांच्याकडून महिलांना झालेल्या मारहाण प्रकरणी खा. राऊत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चेसाठी आले होते. यावेळी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महिला शेतकऱ्यांवरील अन्याय गंभीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक चर्चा केली. महसूलमंत्री बावनकुळे यांच्याशी बोलणे झाले. त्यांनीही दखल घेण्याचे आश्वासन दिले. पुढील आठवड्यात त्यांची भेट घेत या प्रकारावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूसंपादनासाठी ताफा सकाळी ७वाजता कसा गेला, महिला अंघोळी करताहेत असे असताना अधिकारी मारहाण करतो.
मारण्याचा अधिकार याला दिला कोणी, असा प्रश्न उपस्थित करीत, त्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. संसदेतही महिलांच्या न्यायासाठी हा प्रश्न उपस्थित करेन. यात राजकारण करायचे नाही. मंत्री गिरीश महाजन असो की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो त्यांच्यापर्यंत वृद्ध महिलेची तक्रार पोहोचवण्यासाठी मी भेटही घेईन.
समृद्धीसाठी जागा बदलतात, कॅप्टन खरातची जमीन वाचवतात, तर मग शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे वाचविण्यासाठी ते का बदलता येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. निफाड येथेही प्रांताधिकाऱ्यांविषयी तक्रारी केल्या. त्यात भूसंपादनासाठी तीन कोटी ८० लाखांऐवजी फक्त एक कोटी ४० लाख रुपये दर दिला. त्यावर राऊत निफाड येथेही जाईन. तत्पूर्वी महसूलमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे सांगत प्रांताधिकाऱ्यांना महाराष्ट्रात राहायचे आहे की नाही, असा दम भरला.
पवन दत्ता पळाले
सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पवन दत्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करू असे सांगून, त्यांच्या कार्यालयातून निघाले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातही आले नाहीत. त्यामुळे त्यांनी तेथून परिस्थिती लक्षात घेऊन पलायन केल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती.