इगतपुरी : मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाटाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली असून या मार्गावरील अवजड वाहने मुंबई- पुणे एक्सप्रेसमार्गे वळविण्यात आली आहे. काही अवजड वाहने कसारा बायपास येथे काही वेळासाठी थांबवून ठेवण्यात आली होती.
दुरुस्तीसाठी कसारा घाट दोन टप्प्यात बंद राहणार आहे. पहिल्या टप्प्यात २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे. तसेच ३ मार्च ते ६ मार्चदरम्यानही याच वेळेत बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी जुन्या कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती व अन्य कामासाठी कसारा घाट बंद असणार आहे. या कालावधीत नाशिक मुंबई महामार्गावरून नवीन कसारा घाटातून सुरू आहे.
सकाळी दहा वाजेपासून रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली असून प्रवाशांच्या व वाहतुकदारांच्या सुरक्षेसाठी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित, महामार्ग पोलीस केंद्रांचे अधिकारी छाया कांबळे, राम व्होंडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आपत्कालीन घटनेसाठी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य मदतीला कार्यरत होते. दरम्यान या ट्राफिक ब्लॉकमुळे खोडाळा ,विहिगाव, जव्हार मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटनदेवी मंदिर मार्गे नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
नाशिककडे जाताना नवीन घाटातून वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवत प्रवास करावा तसेच कोणीही ओव्हरटेक करू नये असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी केले. कसारा पोलीस व महामार्ग पोलीस कसारा घाटात गस्त करीत वाहनचालकाची सुरक्षा करीत आहेत.
जुना कसारा घाट बंद असल्याने वाहनचालकांचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासन भर उन्हात अवजड वाहने बाजूला लावणे, लहान वाहन चालकांना सूचना देण्याचे काम भर उन्हात पोलीस करीत होते.