नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरणातील जलसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचल्याने नाशिककरांवरील दर शनिवारची पाणीकपात रद्द करण्याची घोषणा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केली. मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावरील ताण लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
महापौर आहेर-आडके यांनी गुरुवारी (दि. २३) गोदावरी नदीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नाशिक शहराला गंगापूर, मुकणे आणि दारणा या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.
त्यापैकी सुमारे ८० टक्के पाणीपुरवठा गंगापूर धरणावर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी गंगापूर धरणातील जलसाठा ६६ टक्क्यांवर होता.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने १७ जूनपासून विशेष कृती आराखडा लागू करून प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली. धरणातील जलसाठा सुरक्षित पातळीवर पोहोचल्याने शनिवारची पाणीकपात रद्द करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले.
गोदावरी नदीला आलेला पूर बघण्यासाठी नदीकाठी, पुलांवर मोठी गर्दी होत आहे. यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौर आहेर-आडके यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले.
गोदाकाठच्या ३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पूरपरिस्थिती धोकेदायक टप्पा ओलांडण्याची शक्यता असल्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्याबाबत विचार सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.
जुन्या नाशिकमधील धोकेदायक काझीगढीवर प्रशासनाचे लक्ष असून, आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.