नाशिक : टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी सन २०१७ मध्ये नाशिक भेटीप्रसंगी त्यांचे आजोबा सर रतन जमशेदजी टाटा यांनी इगतपुरीत फार्म हाउससाठी जमीन खरेदी केल्याची आठवण सांगितली. आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना आपलीही नाशिकशी नाळ जोडली गेल्याचे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पाहायला मिळत होती.
नाशिक महापालिकेने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून पांडवलेणी येथे त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी उभारलेल्या बॉटेनिकल गार्डनच्या पाहणीसाठी रतन टाटा २०१७ मध्ये नाशिकला आले. या भेटीप्रसंगी टाटा यांनी गंगापूर रोडवरील रतन लथ यांच्या घरी पाहुणचार घेतला. त्यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
रतन टाटा यांनी लथ कुटुंबीयांशी अनौपचारिक गप्पा मारताना टाटा कुटुंब व नाशिकच्या ऋणानुबंधाचा उल्लेख केला. टाटा यांनी त्यांचे आजोबा सर रतन जमशेदजी टाटा यांच्या स्मृतींना उजाळा देताना सन १९०७-०८ मध्ये नाशिकच्या इगतपुरीत फार्म हाउसकरिता जागा घेतल्याचे सांगितले. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तसेच निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या इगतपुरीत सर रतन टाटा यांनी पारंपरिक शेती व शेतीपूरक उद्याेगांसाठी ही जागा घेतली. पण, काही कारणास्तव टाटांचे ते स्वप्न अपूर्ण राहिल्याचे सांगताना रतन टाटा यांना गहिवरून आले. मात्र, यानिमित्ताने इगतपुरी व पर्यायाने नाशिकशी आमच्या कुटुंबाची नाळ जोडली गेल्याची भावना टाटा यांनी व्यक्त केली होती. या भेटीप्रसंगी शर्वरी लथ यांनी स्वहस्ते काढलेले पेंटिंग रतन टाटा यांना भेट म्हणून दिले होते.
रतन टाटा यांनी अनौपचारिक गप्पांवेळी नाशिकमधील तत्कालीन रस्ते, मुंबई-पुण्याशी असलेली कनेक्टिव्हिटी, नाशिकमधील औद्योगिक विकास व येथील हवामान याबद्दल भरभरून कौतुक केले. तसेच नाशिकचे भविष्य उज्ज्वल असल्याची भावना व्यक्त केली होती. टाटा यांची नाशिकबद्दलची ती आत्मीयता आजही सर्व नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.