सिन्नर : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोची घोषणा केली होती. मात्र, ४ वर्ष झाले तरी त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री मनोहर लाल यांची भेट घेत त्याबाबत सवित्तर चर्चा करत नाशिक मेट्रो प्रकल्पाला चालना देण्याची मागणी केली.
अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोची घोषणा केली होती. यानुसार नाशिक मेट्रो प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडव्दारे राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी अंदाजे २२,१०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. ज्यात ३२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार होता तर त्यात ३२ स्टेशन प्रस्तावित होते. मात्र, याबाबत फक्त घोषणा झाली आणि पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे खासदार वाजे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आगामी सिहस्थ कुंभमेळ्यात शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिकचा भार येणार आहे. त्यामुळे मेट्रोची अत्यंत गरज असून त्या प्रकल्पास गती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.
सद्यस्थितीत देशात विविध ठिकाणी मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून ते पूर्णत्वास आल्याशिवाय नवीन प्रकल्प हाती न घेण्याचे केंद्र सरकारच धोरण असल्याचे मंत्री मनोहर लाल यांनी सांगितले. तसेच नाशिक मेट्रोसाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे देखील आश्वासन त्यांनी दिले.
मागील ६ महिन्यात याबाबत माझा पाठपुरावा सुरू आहे. केंद्र सरकारकडे तगादा लावून हा प्रकल्प साकारणारच आहे.-खा. राजाभाऊ वाजे.