मनमाड : भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मनमाडकरांना परतीच्या पावसाने चांगलाच दिलासा मिळा आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
मनमाडसह धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण भरून वाहत आहे. दोन वर्षानंतर वागदर्डी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आततरी पालिका प्रशासनाने किमान आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यंदाच्या पावसाळा जिल्ह्याभरात पावसाने थैमान घातलेले असताच मनमाड शहर परिसराकडे मात्र, पावसाने पाठ फिरवली होती. पावसाळा संपत आला तरी शहर परिसरात दोन-तीन वेळा वगळता जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे वागदर्डी धरणात जेमतेम पाणीसाठा होता. ज्या नदीतून धरणात पाणी येते, त्या नदीवर वागदर्डीआधी तब्बल 22 ते 25 छोटे, मोठे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस झाला तरी जोपर्यत सर्व बंधारे पूर्ण भरून वाहत नाहीत तोपर्यत वागदर्डी धरण भरत नाही. गेल्या वर्षी तर दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे पावसाअभावी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. पालखेड धरणातून आवर्तनच्या माध्यामतून मिळणाऱ्या पाण्यातून पालिका प्रशासनातर्फे शहरात महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे सर्वांचे लक्ष पावसाळ्याकडे लागले होते. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर फक्त रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे नदी- नाले, ओढ्यांना पूर आले नाहीत. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने आणि गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरण क्षमतेने भरून वाहू लागले आहे.
वागदर्डी धरण दोन वर्षानंतर ओव्हरफ्लो झाले आहे. मागील वर्षी तर दुष्काळी परिस्थिती असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागली. यंदा मात्र, परितीच्या पावसाने मनमाडकरांवरा कृपा केल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे आता तरी पालिका प्रशासनाने किमान आठवड्यातून एकाद तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.