नाशिक : पाथर्डी-दाढेगाव मार्गावरील वालदेवी नदीच्या पुलावरून शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी ७ च्या सुमारास दुचाकीस्वार दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र, पाण्याचा प्रचंड वेग असल्याने, रात्री उशिरापर्यंत दुचाकीस्वाराचा पत्ता लागला नाही. दरम्यान, दरवर्षी या पुलावरून अपघाताच्या घटना घडत असल्याने, या धोकादायक पुलाची पुनर्बाधणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच हा पूल खचल्याची घटना घडली होती. यापूर्वीही याच पुलावरून अनेक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना न घडल्या असून, तरीही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी आमदार निधीतून या पुलाचे बांधकाम करण्यात आले.
मात्र पूल उंच व सुरक्षित उभारण्याऐवजी पाईप टाकून कमी उंचीचा पूल बांधण्यात आल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर पाण्याचा प्रवाह अडतो आणि संपूर्ण पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे हा पूल दरवर्षी जीवघेणा ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, घटनेनंतर सोमनाथ बोराडे, अंकुश भोर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी स्वतः नदीकाठी शोधकार्य केले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांनाही यश आले नाही.