नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
बदलत्या हवामानामुळे फळपिकांचे वाढते नुकसान लक्षात घेता, प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त चार दिवस उरले आहेत. दि. १४ जुलै ही अंतिम मुदत आहे.
नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील पात्र फळबागाधारकांनी अर्ज करीत आपल्या फळबागेला विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, लिंबू, पेरू, सीताफळ, चिकू, संत्रा, हळद तसेच इतर अधिसूचित फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
कमी पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, वाढते तापमान आणि आर्द्रता यासारख्या प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
हवामान निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. संबंधित फळपिकानुसार विमा हप्ता व जोखीमस्तर वेगवेगळे असल्याने अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. बदलत्या हवामानाच्या जोखमीपासून संरक्षणासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये पीक नोंद
ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी
आधारशी संलग्न बँक खाते
उत्पादनक्षम फळबाग
फळबागेचे जिओ टॅगिंग अनिवार्य