लासलगाव : कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असतानाच लासलगावच्या घाऊक बाजारात कांद्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. मागील आठवड्यात ४५० रुपयांनी घसरण झाल्यानंतर आता कांद्याच्या दरात सुधारणा होत कांद्याला सरासरी ४४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. त्यामुळे कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळत आहे. तर सरकारच्या बाजारातील हस्तक्षेपानंतरही कांद्याचे दर स्थिर करण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे.
कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरवण्यास सुरुवात केली आहे. तसेच 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ'च्या माध्यमातून दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये स्वस्त दरात कांदा विक्री होत आहे. दिल्लीमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बफर स्टॉकमधील कांदा ३५ रुपये किलो दराने विक्रीची मोहीमही सुरू केली आहे. मात्र, लासलगावसारख्या प्रमुख बाजारपेठेत दर पुन्हा वाढल्याने बाजारातील मागणी-पुरवठ्याचे गणित अद्याप अस्थिर असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने २०२६-२७ साठी दोन लाख टन रब्बी कांदा बफर स्टॉकसाठी खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी आतापर्यंत सुमारे १.२१ लाख टन कांद्याची खरेदी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, साठवलेल्या कांद्याची गुणवत्ता खालावणे आणि नवीन खरीप कांद्याची आवक उशिराने होणे ही दरवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे बाजारातील विश्लेषणातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप असूनही कांद्याचे दर नोव्हेंबरपर्यंत तुलनेने मजबूत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लासलगाव बाजारातील दरवाढीमुळे एकीकडे ग्राहकांवरील महागाईचा दबाव वाढत असताना दुसरीकडे कांदा उत्पादकांना चांगल्या दराची आशा निर्माण झाली आहे. मात्र, सरकारकडून बफर स्टॉकचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात उतरवला गेल्यास भविष्यात दरावर पुन्हा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
आवक घटली, दराला तेजीचा आधार
लासलगाव बाजारातील कांद्याच्या आवकेत मोठी घट झाल्याने दरवाढीला आधार मिळत आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये बाजारातील दैनंदिन आवक सुमारे १५ हजार क्विंटलवरून ८ हजार क्विंटलपर्यंत घसरली होती. आवक जवळपास निम्म्यावर आल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. दक्षिण भारतातून येणाऱ्या नवीन खरीप कांद्याच्या आवकेत विलंब होत असल्याने देशांतर्गत पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यातच साठवलेल्या कांद्याची गुणवत्ता खालावल्याने उपलब्ध चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारात मागणी वाढत आहे. नवीन कांद्याची आवक वाढेपर्यंत दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापारी व बाजार विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.