जुने नाशिक : येथील सारडा सर्कल ते दूधबाजार रस्ता, चौक मंडई परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेतर्फे शनिवारी (दि. २०) हातोडा मारला जाणार आहे. या कारवाईच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत अतिक्रमणधारकांना ध्वनिक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देण्यात आली असून, अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्याच्या दृष्टीने महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी (दि. १९) दुपारी ३.३० ते ४ दरम्यान सारडा सर्कल, चौक मंडई, जहांगीर मशीद व कब्रस्तान रोड परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक दाखल झाले.
यावेळी वाहनावरील ध्वनिक्षेपकाद्वारे दुकानदारांना आपले साहित्य व दुकाने तत्काळ आवरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, आपले सामान स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा कारवाईदरम्यान झालेल्या कोणत्याही नुकसानीस महापालिका जबाबदार राहणार नाही, असा इशाराही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला. अतिक्रमित भागावर महापालिकेकडून खुणाही करण्यात आल्या.
दरम्यान सूचना मिळताच सारडा सर्कल ते चौक मंडई परिसरातील अनेक दुकानदारांनी स्वतःहून आपापली दुकाने आवरण्यास सुरुवात केली. काही व्यावसायिकांनी आपले साहित्य हलविण्याचाही प्रयत्न सुरू केला. सारडा सर्कल ते फाळके रोड परिसरातही खुणा करण्यात आल्या असून, तेथील व्यावसायिकांनाही दुकाने व साहित्य हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पंचवटी : रामकुंड परिसरातील 'रामकाल प्रकल्प'च्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवारी (दि. १९) दुसऱ्या दिवशीही धडक मोहीम सुरू ठेवली. या कारवाईत गोदाघाटावरील ७० वर्षे जुने असलेले 'भारत हॉटेल' प्रशासनाने दोन तासांत जमीनदोस्त केले. सुरुवातीला हॉटेलचालकाकडून कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनपाने कायदेशीर नोटीस बजावलेली असल्याने अखेर हे अतिक्रमण हटविण्यात आले.
गोदातीरावरील गंगा घाटावर सिद्धलक्ष्मी मंदिर, स्वयंभू अर्धनारीनटेश्वर मंदिर आणि श्रीसंत शिरोमणी संतसेना महाराज मंदिर याच ठिकाणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी सिद्धलक्ष्मी मंदिराशेजारी भाविकांना बसण्यासाठी मंडपाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, कालांतराने या जागेचा व्यावसायिक वापर सुरू होऊन तिथे 'भारत हॉटेल' उभे राहिले. गेल्या ७० वर्षांपासून हे हॉटेल या ठिकाणी सुरू होते.
रामकाल प्रकल्पाच्या कामासाठी हे अतिक्रमण काढणे आवश्यक असल्याने, मनपाने आधीच नोटीस बजावून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी ही इमारत पाडण्यात आली. याच परिसरात संत सेना महाराज मंदिर असून, या मंदिराचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे आणि नाभिक समाजाला मुंडन विधीसाठी स्वतंत्र व हक्काची जागा मिळावी, अशी मागणी नाभिक समाजातर्फे प्रशासनाकडे करण्यात आली. संत सेना महाराज मंदिराची विधिवत पूजाअर्चा करूनच ते सुरक्षितपणे हटविले जाईल. मुंडन विधी जागेबाबत वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर चर्चा करीत जागेचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन समाजबांधवांना दिले.