नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यातही हवामान बदल दिसून येत असून हवामान विभागाने गुरुवार (दि.26) ते शनिवार (दि.28) या तीन दिवसांत नाशिक, जळगावमधील काही भागात गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली असून द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे. ढगाळ वातावरणात थंडीची लाट आली आहे.
नाशिकमध्ये पुन्हा एकदा वातावरणात कमालीचा बदल झालेला पहावयास मिळत आहे. सायंकाळनंतर गारवा वाढत असून धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. ढगाळ हवामान, पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी सलग काही दिवस थंडीची लाट आली होती. तर रविवार (दि.22) रोजी सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचे नाशिककरांनी अनुभवले. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर परिणाम होत आहे. मागील दोन ते तीन दिवसांत चित्र पूर्णत: बदलले आहे. मंगळवारी (दि.24) शहरात 15 अंश तापमानाची नोंद झाली.
गेल्या आठवड्याचा विचार करता तापमानात सहा अंशांनी वाढ झालेली आहे. थंडीचा जोर ओसरला असला तरी बोचणारे वारे गारव्याची अनुभूती देत आहेत. पहाटे सर्वत्र धुके पसरत आहे. दाट धुक्यामुळे सकाळी वाहनधारकांना दिवे लावून वाहने हाकावी लागत आहेत. ढगाळ वातावरणात सूर्याचे अधूनमधून दर्शन घडते. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहील असे सांगण्यात आले असून पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी त्यानुसार कामांचे नियोजन करावे, असे हवामान विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. मध्यंतरी दोन दिवस अवकाळी पाऊस झाला होता. त्याची सर्वाधिक झळ द्राक्षबागांना बसली. बागलाणसह कळवण, मालेगाव, देवळा या भागात द्राक्ष द्राक्षबागांना पावसाची झळ बसण्याची शक्यता आहे.