Nashik unseasonal rain hailstorm market slowdown
जायखेडा : मोसम खोरेसह बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि बाजारातील मंदीचा तिहेरी फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शेतीमालाचे घसरलेले दर, वाढती महागाई आणि अधिक मासातील पारंपरिक खर्च यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
यंदा कांदा पिकाच्या गळतीच्या काळात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या आशांवर अक्षरशः पाणी फेरले. अनेक ठिकाणी शेतात काढणीसाठी तयार असलेला कांदा पावसामुळे भिजला, सडला आणि मोठ्या प्रमाणात खराब झाला. काही भागांत गारपिटीमुळे कांद्याची पात आणि गड्ढे दोन्हींचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पीक उभे केले होते; मात्र निसर्गाच्या एका फटक्याने त्यांच्या कष्टांचे मोल मातीमोल झाले. फक्त कांदाच नव्हे तर द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो यांसारख्या फळ आणि भाजीपाला पिकांनाही योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना बाजारात मिळणारे दर मात्र अत्यंत कमी असल्याने शेती करायची तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. ग्रामीण भागापुरतेच नव्हे तर शहरांतील सर्वसामान्य कुटुंबांनाही महागाईचा मोठा फटका बसत आहे. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, साखर, डाळी, तांदूळ, भाज्या यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने घरखर्च सांभाळणे कठीण झाले आहे. उत्पन्न मर्यादित असताना खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.
१७ मेपासून सुरू होणाऱ्या अधिक मासाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक ठिकाणी जावयाचा मानपान, धार्मिक विधी, दानधर्म आणि पारंपरिक कार्यक्रम पार पाडले जातात. मात्र, यंदाच्या आर्थिक परिस्थितीत या परंपरा जपताना अनेक कुटुंबांची दमछाक होत आहे. पूर्वी जावयाला सोन्याची अंगठी, चांदीची भेट किंवा महागडे कपडे देण्याची परंपरा होती. परंतु यंदा सोने-चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे सामान्य कुटुंबांना अशा खर्चाचा मोठा ताण जाणवत आहे.
नाती टिकवायची की खर्च सांभाळायचा? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. साधेपणाला वाढती पसंती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक कुटुंबे खर्चिक परंपरांऐवजी साधेपणाने कार्यक्रम पार पाडण्यास प्राधान्य देत आहेत. दिखाव्यापेक्षा नात्यांतील आपुलकी महत्त्वाची असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. बदलते हवामान, शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असून, अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर चिंता आणखी वाढली.
ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम शेतीमालाला भाव नसल्याने ग्रामीण बाजारपेठांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने खरेदी घटली असून, कृषी व्यवसायाशी संबंधित छोटे व्यापारी आणि दुकानदारांनाही त्याचा फटका बसत आहे. विवाहसोहळे, धार्मिक कार्यक्रम आणि सणांमध्येही खर्च कमी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
साधेपणाला वाढती पसंती
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक कुटुंबे खर्चिक परंपरांऐवजी साधेपणाने कार्यक्रम पार पाडण्यास प्राधान्य देत आहेत. दिखाव्यापेक्षा नात्यांतील आपुलकी महत्त्वाची असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. बदलते हवामान, शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असून, अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर चिंता आणखी वाढली आहे.