नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील तसेच सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वाधिक उंच किल्ला असलेल्या साल्हेरला येत्या २७ व २८ तारखेला युनेस्काेचे पथक (UNESCO team) भेट देत पाहणी करणार आहे. या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा हे बुधवारी (दि. ११) साल्हेरला भेट देणार आहेत. त्यामुळे साल्हेरच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीतील समावेशाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. (Salher's inclusion in the World Heritage Site list will pave the way)
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूमधील जिंजीच्या किल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव युनेस्कोला (UNESCO) पाठविला आहे. या यादीत नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्याचा समावेश आहे. गेली ३५० वर्षाहून अधिक काळापासून ताठ मानाने हा किल्ला उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या या किल्लाचा लवकर जागतिक वारसा स्थळात समावेश होणार आहे.
युनेस्कोचे पथक साल्हेरची (Salher Fort) पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. १०) आढावा बैठक पार पडली. दरम्यान, युनेस्कोने वारसा स्थळांच्या यादीत साल्हेरचा समावेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची नव्याने जगाला ओळख हाेईल. त्यासोबत युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करु शकेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले तर इतिहासातले नवे दुवे सापडू शकतील, अशी माहिती पुरातत्व विभागाकडून बैठकीत देण्यात आली.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील साल्हेरसह शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे अकरा तसेच जिंजी किल्ल्यांचा समावेश जागतिक यादीत करण्यासंदर्भातील प्रस्ताव युनेस्कोला सादर केला आहे. त्यानुषंगाने युनेस्काेचे पथक राज्यात येणार आहे.