नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्यामुळे मानवाबरोबरच शेती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. नाशिक पट्ट्यात वाढत्या उन्हामुळे टोमॅटोची पिके अक्षरशः होरपळून निघाली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असून, शेतकरी संकटात सापडला आहे.
गत आठवड्यात अवकाळी व गारपीटीने शेतीमालाचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा थंडावा होता. मात्र, गत तीन ते चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. या कडक उन्हामुळे टोमॅटोच्या झाडांवरील फुले गळून पडत आहेत, तर झाडाला लागलेली फळे उष्णतेमुळे काळवंडत आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते, कडक उन्हामुळे फळांवर सनबर्निंग (सूर्यदाह) होतो, त्यामुळे टोमॅटोवर पांढरे किंवा काळे चट्टे पडतात. अशी डागाळलेली फळे बाजारात विक्रीसाठी नेल्यास त्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणेही कठीण झाले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विहिरी आणि क्यूबवेलच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे.
टोमॅटो हे पीक पाणी देण्याबाबतीत अत्यंत संवेदनशील असते. पिकाला जगविण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करीत असले, तरी उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. अनेक ठिकाणी पाणी कमी पडत असल्याने बागा जळून जात आहेत. सध्या टोमॅटोच्या दरातही मोठी चढ उतार होत असलेली पाहायला मिळत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे नाशिकचा बळीराजा पुन्हा एकदा दुहेरी कात्रीत सापडला आहे.
रात्री-अपरात्री पाणी देऊनही पीक वाचवणे कठीण झाले आहे. उन्हामुळे टोमॅटोचा आकार लहान राहात असून, फळांची गुणवत्ता ढासळली आहे. औषधे आणि खतांचा खर्च वाढत आहे. पण उत्पन्न मात्र निम्म्यावर येण्याची भीती आहे.- किरण काकड शेतकरी, मखमलाबाद