लासलगाव : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे द्राक्ष पंढरी मध्ये थंडीचा कडाका कायम राहिला असून कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 5.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्या आधार घेत आहेत. थंडीचा कडाका कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली.
देशातील उत्तरेकडील राज्यात थंडीची तीव्र लाट आहे. अशात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. वातावरणातील या बदलाचा फटका निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्याला बसला आहे.निफाड ला 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली असून या हंगामातील नीचांकी तापमान असल्याचे दिसून आले आहे.
वातावरणातील या बदलाचा फटका राज्यासह निफाड तालुक्यातील तापमानावर झाला आहे. परिणामी तापमानात कमालीची घट झाली आहे. अनेक जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा दररोज घसरत आहे. तर निफाडचे तापमान 5.6 अंश सेल्सिअस वर येऊन पोहचले असून या बोचऱ्या थंडीने मात्र नागरिकांना हुडहुडी भरली असल्याचे दिसत आहे.
महाबळेश्वर आणि लोणावळ्यासारखे तापमान निफाड तालुक्यात घटले आहे.दुसरीकडे द्राक्ष पंढरीत तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.