नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची राज्यात नवनिर्माण यात्रा सुरू असून, यात्रेचा विदर्भ टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. आता मिशन उत्तर महाराष्ट्र सुरू केले असून, त्यासाठी शनिवारी (दि. ५) ते नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील ४७ विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. (MNS President Raj Thackeray's Navnirman Yatra is going on in the state)
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत "एकला चलो चा' नारा दिला आहे. २८८ पैकी २२५ ते २५० जागा लढविण्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले असून, त्यासाठी राज्यभरात त्यांची नवनिर्माण यात्रा सुरू आहे. या यात्रेचा विदर्भ टप्पा पूर्ण झाला असून, आता उत्तर महाराष्ट्रात यात्रा काढली जाणार आहे. (Mission Uttar Maharashtra)
उत्तर महाराष्ट्रात यात्राची सुरुवात नाशिकमध्ये दोन दिवसीय दौऱ्याने होत आहे.
शनिवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता त्यांचे सहकुटुंब ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह मुंबई आणि महाराष्ट्रातील मनसेचे वरिष्ठ नेतेमंडळी त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यानंतर ठाकरे वणी गडावर सप्तश्रृंगी देवीचे सहकुटुंब दर्शन घेणार आहेत. पुढे चांडक सर्कल येथील हॉटेल एसएसके येथे ते मुक्कामी असतील.
रविवारी (दि. ६) सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत हॉटेल एसएसके येथे उत्तर महाराष्ट्रातील विधानसभानिहाय आढावा बैठका घेणार असल्याने, उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक याठिकाणी येणार आहेत.
दरम्यान, गेल्या गणेशोत्सव काळात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार होते. मात्र, ठाणे दौऱ्यावर असताना त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने हा दौरा रद्द झाला होता. आता दोन दिवस ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीबाबत ते नेमकी काय भूमिका घेणार याबाबत शंकेची पाल अजूनही इच्छुकांच्या मनात चुकचुकत आहे.
मनसेच्या स्थापनेनंतर २००७ मध्ये नाशिक शहराची तब्बल २३०० पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यावेळी या कार्यकारिणीने मनसेला वैभवदेखील प्राप्त करून दिले होते. नंतरच्या काळात पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडल्याने, पक्षाची घडी पूर्णपणे विस्कटली. आता शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी तब्बल २२०० पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी तयार केली आहे. मात्र, ही कार्यकारिणी पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देणार काय? हा प्रश्न कायम आहे.