Nashik Rain Update
नाशिकचे भावली धरण ओव्हरफ्लो, पावसाचा मुक्काम कायम pudhari photo
नाशिक

Nashik Rain Update | नाशिकला पावसाचा मुक्काम कायम, भावली धरण ओव्हरफ्लो

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सलग चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकला असून, बुधवारी (दि. २४) दिवसभर त्याने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा व इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाली आहे. भावली धरण सायंकाळी ४.३० च्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. दारणा धरणातून ३७४६ क्यूसेक व नांदूरमध्यमेश्वरमधून २४२१ क्यूसेक वेगाने विसर्ग केला जात आहे. हवामान विभागाने गुरुवारी (दि. २५) पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये)

त्र्यंबकेश्वर १००.३, सुरगाणा ६३.१, इगतपुरी ४९.०, पेठ ४४.३, दिंडोरी ३१.७, बागलाण २०.५, कळवण १९.०, चांदवड १४.८, नाशिक ११.२, देवळा ९.७, सिन्नर ७.४, निफाड ५.९, मालेगाव ४.८, नांदगाव ३.४, येवला ३.२, सरासरी २१.०.

राज्यात एकीकडे जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने नाशिकमध्ये म्हणावी तशी हजेरी लावलेली नव्हती. जूनमध्ये जेमतेम पाऊस झाल्यानंतर जुलैचा पहिल्या पंधरवड्यात त्याने दडी मारली होती. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे ढग जमा झाले होते. मात्र, गेल्या शनिवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठाेकला आहे.

७७.४ टक्के पावसाची नोंद

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसांपासून सलग १०० मिमी पर्जन्याची नोंद तालुक्यात होत आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख लाभलेल्या इगतपुरीत २४ तासांमध्ये ४९ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. तालुक्यात सलगच्या पावसामुळे यंदाच्या हंगामात भावली धरण प्रथमच ओव्हर फ्लो झाले आहे. तर दारणा धरणातही ७६ टक्के जलसाठा निर्माण झाल्याने धरणातून दुपारी ३ ला १८७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. धरणातील पाण्याची आवक अधिक असल्याने रात्री ८ पर्यंत हा विसर्ग ३७४६ क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील पाच तालुक्यांत जुलैमधील सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. तसेच एकूण सरासरीचा विचार करता १७४.४ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत ७७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

गंगापूरचा साठा ४५ टक्क्यांवर

जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ हाेण्यास मदत मिळाली. गंगापूर धरणाचा साठा २३९० दलघफू (४२.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये एकूण उपयुक्त साठा १७ हजार २८१ दलघफूवर पोहोचला आहे. त्याचे प्रमाण २६.२२ टक्के इतके आहे.

SCROLL FOR NEXT