नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारी शहर व परिसराला पावसाने झाेडपून काढले. शहराच्या काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामूळे रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहत होते. तर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. त्यातच बहुतांक्ष भागातील बत्ती गुल झाली. त्यामुळे शहरवासीयांच्या राखीपाैर्णिमेच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. अवघ्या तासाभरात शहरात १३ मिमी पर्जन्याची नोंद झाली.
नाशिकला गुरुवारपर्यंत येलो अलर्ट
धो-धो सरींमुळे शहरातील रस्ते जलमय
पाणी साचल्योन वाहतूक व्यवस्था काेलमडली
छोट्या-माेठ्या व्यावसायिकांचे हाल
गेल्या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुनर्रागमन केले आहे. शहर व परिसरात सकाळपासून ढगाळ हवामान होते. दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर अधिक असल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये रस्ते जलमय झाले. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सराफ बाजर, मेनरोड, दहिपुल, नेहरु चाैक आदी भागांमध्ये रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहत हाेते. त्यामुळे व्यावसायिकांचे हाल झाले. शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर गुडगाभर पाणी साचले. परिणामी पोलिसांनी उड्डाणपुलावरील एका बाजूची वाहतूक बंद केली. केटीएचएमसमोरील उड्डाणपुलाखाली प्रचंड पाणी साचल्याने तेथेही काही काळ वाहतुक बंद पडली होती. दरम्यान, नाशिकरोड, जेलरोड, नांदुर-मानुर, आडगाव, सातपूर, पाथर्डी आदी भागांमध्ये धो-धो सरी बरसल्या.
राखीपौर्णिमा सणाच्या पार्श्वभुमीवर नाशिककरांनी कार्यालयांमधून लवकर सुट्टी घेत घर गाठण्याचा बेत आखला. परंतु, ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. त्यातच शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर तळे साचल्याने वाहतूकीला त्याचा फटका बसला. त्यामुळे महापालिकेच्या पावसाळीपूर्व कामांवरच शंका उपस्थित केली. दुसरीकडे सिडकोसह अनेक भागात खंडीत झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांच्या हाल अपेष्ठांमध्ये अधिक भर पडली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदी तालूक्यांमध्ये जोरदार सरी बरसत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालेहे. अन्यही तालूक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतो आहे. आठवडाभरानंतर पावसाने पुनर्रागमन केल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५५६ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ६० टक्के हे प्रमाण आहे.