नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. सिन्नर फाटा येथील सर्वपक्षीय बैठकीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची एकजूट दिसून आली. शिर्डीमार्गे प्रस्तावित रेल्वेमार्गाला एकमुखी विरोध करण्यात आला. नाशिक सिन्नर संगमनेरमार्गे पुणे रेल्वेमार्गाची मागणी करण्यात आली. खासदार राजाभाऊ वाजे यांनी सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन रेल्वेमंत्री व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याची ग्वाही दिली.
नाशिक पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदललेल्या आराखड्याविरोधात रविवारी सिन्नर फाटा येथील बाजार समिती आवारात बहुजन शेतकरी संघटनेतर्फे सर्वपक्षीय बैठक झाली. अध्यक्षस्थानी अशोक खालकर होते. बैठकीत शिर्डीमार्गे रेल्वेमार्गाला तीव्र विरोध नोंदवत, पूर्वी सर्वेक्षण झालेल्या नाशिक सिन्नर-संगमनेर - पुणे या सरळ मार्गालाच मंजुरी द्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, नाशिक - पुणे रेल्वे हा नाशिकच्या विकासाशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा समसमान निधी असल्याने सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. लवकरच रेल्वेमंत्री आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन नाशिककरांच्या भावना व सरळ रेल्वेमार्गाचे महत्त्व केंद्र सरकारसमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सरोज आहिरे यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांकडे जुन्या सर्वेक्षणानुसारच रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. आमदार सीमा हिरे यांनीही शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी सरळ रेल्वेमार्गालाच पाठिंबा असल्याची भूमिका मांडली. बैठकीत विविध संस्था, संघटना, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिर्डीमार्गे रेल्वेमार्ग झाल्यास नाशिक व सिन्नर तालुक्यातील अनेक गावे बाधित होतील.
सरळ मार्गामुळे उद्योग, शेती, व्यापार, शिक्षण आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टला समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला. बैठकीला खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, सरोज अहिरे, नगरसेवक भारती ताजनपुरे, योगेश भोर, योगेश गाडेकर, वैशाली दाणी, रुचिरा साळवे, माजी महापौर दशरथ पाटील, तसेच निमाचे राजू पानसरे, आयमाचे सोनवणे, निवृत्ती अरिंगळे, सुदाम बोराडे, मधुकर सातपुते, प्रा. हरीश आडके, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड उपस्थित होते.
आधी जमीन संपादित, मग नवीन मार्ग का ?
नाशिक - पुणे रेल्वेमार्गासाठी यापूर्वी सिन्नर तालुक्यातील १७ आणि नाशिक तालुक्यातील ५ अशा २२ गावांतील जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. शेकडो गटातील २३७हेक्टरहून अधिक जमीन संपादित करत शेतकऱ्यांना ५८ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
त्यामुळे आता पुन्हा शिर्डीमार्गे नवीन रेल्वेमार्गासाठी जमीन संपादन करण्याची गरज काय, असा प्रश्न नागरिक व शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यांच्या मते, पूर्वी सर्वेक्षण झालेल्या सरळ मार्गालाच मंजुरी दिल्यास वेळ, पैसा आणि शेतजमिनींची हानी टाळता येईल