नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत सात जणांचा बळी गेल्याची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दखल घ्यावी लागल्यानंतर मनपा आयुक्त मनीषा खत्री ॲक्शन मोडवर आल्या आहेत.
खड्डे आणि त्यासंदर्भातील लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह बांधकाम विभागातील पाच, पाणीपुरवठा विभागातील चार कार्यकारी अभियंते व २६ उपअभियंते अशा ३६ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत समाधानकारक खुलासा न केल्यास अधिकाऱ्यांवरील प्रस्तावित कारवाईचा अहवाल थेट राज्य शासनाला सादर करण्याचा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
सिंहस्थकामांतर्गत शहरभर खोदलेले रस्ते आणि त्यात पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिक शहराची अवस्था दयनीय बनली आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत सात जणांचा बळी गेले असून, अनेक जण जखमी आहेत. या खड्ड्यांविरोधात निर्माण झालेल्या जनक्षोभाची थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत मुंबईत आढावा बैठक घेतल्यानंतर महासभेतही खड्ड्यांवरून रणकंदन माजल्याचे चित्र दिसले.
महासभेत नगरसेवकांनी खड्ड्यांचे खापर सिंहस्थ प्राधिकरण, एमएनजीएल व स्मार्ट सिटी कंपनीवर फोडले. या खड्ड्यांविरोधात मनपा आयुक्त खत्री यांनीदेखील कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. बांधकाम विभागातील पाच कार्यकारी अभियंते तसेच आठ उपअभियंते, पाणीपुरवठा विभागातील चार कार्यकारी अभियंते व १८ उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
खड्ड्यांसोबतच शहराच्या विविध भागांत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. खड्डे बुजवताना झालेल्या दुर्लक्षामुळे आणि जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि त्यानंतर दुरुस्तीचे कामही वेळेत होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
बांधकाम विभागातील प्रशांत पगार, संदेश शिंदे, रवींद्र बागूल, रवींद्र पाटील, नवनीत भामरे, नरेंद्र शिंदे, संजय अडेसरा, विशाल गरूड या कार्यकारी अभियंत्यांसह नीलेश साळी, नितीन राजपूत, हेमराज नांदुर्डेकर, भरत ठाकरे, बाळा गाजुल, प्रशांत बोरसे, ज्ञानेश्वर जगताप, भरत ठाकरे, दत्तात्रय शिंगाडे, सुरेश पाटील, दत्तात्रय कोल्हे, हेमंत पठे यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
"शहरातील खड्डे दुरुस्तीबाबत महापालिकेच्या नऊ कार्यकारी अभियंत्यांसह २६ उपअभियंते, कनिष्ठ अभियंत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. खुलासा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून, समाधानकारक खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे."— मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका
शहरातील अनेक रस्त्यांवर जीवघेणे खड्डे असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार सूचना देऊनही खड्डे बुजविण्याचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. या विलंबाची नेमकी कारणे काय आहेत याचा खुलासा तीन दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावा, असे निर्देश आयुक्त खत्री यांनी नोटीसीद्वारे दिले आहेत. समाधानकारक खुलासा न केल्यास किंवा मुदतीत उत्तर न दिल्यास संबंधित अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन गैरवर्तणुकीचा स्पष्ट अहवाल थेट राज्य शासनाकडे पाठवून पुढील कारवाई केली जाणार आहे.
खड्ड्यांमुळे ७ जणांचा बळी गेल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक; नाशिक मनपा अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
मनपा आयुक्त मनीषा खत्री ॲक्शन मोडवर! ३ दिवसांत खुलासा न केल्यास निलंबनाचा इशारा
रस्त्यांवरील खड्डे अन् फुटणाऱ्या जलवाहिन्या; नाशिक मनपातील ९ कार्यकारी अभियंत्यांवर टांगती तलवार
सिंहस्थ कामे, एमएनजीएल अन् खड्ड्यांचे तांडव; नाशिक महासभेत नगरसेवकांचा तीव्र संताप
"तीन दिवसांत उत्तर द्या, नाहीतर शिस्तभंगाची कारवाई!"; आयुक्त मनीषा खत्री यांचा कडक इशारा
नाशिकच्या रस्त्यांची दयनीय अवस्था; निष्काळजी अभियंत्यांचा अहवाल थेट राज्य सरकारकडे जाणार
पाणीपुरवठा अन् बांधकाम विभाग रडारवर! नाशिकमधील २६ उपअभियंत्यांना नोटीसा
हजारो लिटर पाणी वाया अन् जीवघेणे खड्डे; नाशिक महापालिकेतील निष्काळजीपणा चव्हाट्यावर
जनक्षोभानंतर नाशिक मनपात खळबळ; खड्डे न बुजवणाऱ्या अधिकाऱ्यांवर अखेर कारवाईचा बडगा