नाशिक : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी चर्चेत असून त्यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, माझा पालकमंत्री पदासाठी अजिबात हट्ट नाही, नाशिकसाठी जे काही करायचे आहे ते मी करत आहे, असे सांगून यावर बोलण्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी टाळले आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा स्पस्पेन्स वाढला आहे.
नाशिक येथे रविवारी (दि.15) प्रसार माध्यमांशी मंत्री भुजबळ यांनी संवाद साधला. रश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले त्यावर विचारले असता मंत्री भुजबळ म्हणाले की, मी पस्तीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडली असून तेथे कोण निर्णय घेतो, हे मला माहिती नाही. मी सेनेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तिथे जाण्याचा प्रश्न नाही. मी शिवसेना सोडली त्यानंतर मोठे रणकंदन झाले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि आमचे देखील मोठे वाद झाले होते. मात्र, नंतरच्या काळात आम्ही एकत्र बसून तो संपूर्ण वाद मिटवला. त्यावेळी सेनेत सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे हेच घेत होते. आता कोण निर्णय घेतात हे मला नाही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांसोबत कुंभमेळ्याची कामे असोत, की शहरातील अन्य प्रश्न यावर चर्चा सुरू आहे.
द्वारका चौकात होणारी वाहतूक कोंडी हा त्याचाच एक भाग आहे. अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. सर्कल काढण्यात आला आहे. याठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू होण्यासाठी अजून आठ दिवस वाट बघावी लागेल, असेही भुजबळ यांनी सांगितले. माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ यांनी आर्थिक संदर्भातील प्रश्न मंत्रिमंडळात सोडवले जातात, तो मंत्रिमंडळाचा निर्णय असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.