ठळक मुद्दे
स्टोन क्रेशन आणि डांबर प्रकल्पातील धुळ अन् कार्बन प्रदुषण रोखणारी जैविक सरंक्षक कवच
समृद्ध जैविविधतेने समृद्ध परिसर, वन्य, सरपटणारे प्राणी,पक्षी,वृक्षवेलींची विपूल प्रजाती
पोषक इकोसिस्टिममुळे बहरले जैविक नंदनवन, पर्यावरणस्नेही, निसर्गपूरक पर्यटनाला बहर
२६ मानवनिर्मित तलाव, त्रिस्तरीय संरक्षक भिंत, बांबू वृक्षवेलींची चरीचेही निसर्गकुंपन
संरक्षक भिंतीजवळील चरीत खळाळले जलप्रवाह, भूजल पातळीतही कमालिची वाढ
नाशिक : निल कुलकर्णी
चुंचाळे-सारुळ, बेलगावढगा शिवारातील 'श्री नासिक पंचवटी पांजरापोळ' संस्थेने १४७ वर्षपूर्ण केली आहेत. संस्थेच्या गायींना दरवर्षी हिवाळ्यात व उन्हाळ्यात चाऱ्याचा तुटवडा भासत असे. त्यामुळे संस्थेने स्वमालकीच्या खडकाळ, नापिक ओसाड जमिनीवर वृक्षलागवड व जलसंवर्धनाची कामे घेऊन येथे सृष्टीतून नंदनवन फुलवला. या परिसरात साडेचार लाख वृक्ष लागवड, जलसंधारणाच्या कामातून समृद्ध वनविकसित केले. जवळील सारोळं येथील 'खडी क्रेशर'ची माती, धुळ आणि डांबर प्रकल्पातील कर्ब वायूंचे प्रदुषण येथील वनराईमुळे जैविक भिंत कवच काम करते. पर्यायाने हा परिसर नाशिकची हवा शुद्ध करणारा, प्राणवायू देणारी 'ऑक्सिजन फॅक्ट्ररी' झाली आहे. विपूल वृक्षरांजीसह, समृद्ध जैववैविध्य, निसर्गस्नेही, पर्यावरणपूरक प्रकल्प, कृषी व निसर्ग पर्यटन, जलसंधारण, सेंद्रिय खतनिर्मिती, सौर ऊर्जा प्रकल्प यामुळे अभ्यासक, पर्यटकांसाठी येथील परिसर नंदनवन झाले आहे. 'नाशिकच्या फुफ्फुसां'चा हा स्कॅनिंग रिपोर्टाज.!
संस्थेच्या गायींना दरवर्षी हिवाळ्यासह उन्हाळ्यातही चाऱ्याचा तुटवडा भासत असे. त्यामुळे संस्थेने चुंचाळे शिवारात संस्थेने स्वतःच्या मालकीच्या खडकाळ व नापिक ओसाड जमिनीवर जलसंधारणाची कामे सुरु केली. 'पाणी आडवा पाणी जिरवा' प्रकल्प राबविला. पावसाचे पाणी साठविणारे २७ जलसाठे निर्माण केले. उंच भूभागातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी पाच फूट खोल व तीन फूट रुंद अशा चाऱ्या खोदल्या. या चाऱ्यांची लांबी जवळपास ४०,००० फूट इतकी आहे. वाहून जाणारे पाणी अडविल्यानंतर ते जमिनीत मुरते व अतिरिक्त पाणी तळ्यांकडे वहन केले जाते. यासह विहिरी व बोअरवेल पुनर्भरण प्रकल्प राबवून संस्थेने वाहत्या पाण्याला थांबवले आणि ते जमिनीमध्ये मुरावे यासाठी प्रकल्प राबवला. आज येथील विहिरी व बोअरवेल पाण्याला जमिनीत मुरवल्यामुळेच जलसमृद्ध झाल्या आहेत. जलसंधारण उपक्रमांमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ तर झालीच, परंतु, त्याचा फायदा संस्थेच्या शेतीसोबतच आसपासचे शेतकरी, रहिवाशी तसेच उद्योगांना देखील झाला. शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीत फक्त पावसाळ्यातच पिके घेता येत होती, ती आता ओलिताखाली आली. त्यातून द्राक्षे, पालेभाज्या आदी उत्पादने शेतकरी घेत आहेत. जलसंधारण कामांमुळे मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र लागवडीखाली आले.
संस्थेने गोदावरीची उपनदी 'नंदिनी'च्या पाणलोट क्षेत्रात स्वमालकीच्या खडकाळ जमिनीचा विकास केला. त्या भूभागावर स्वखर्चाने लाखो वृक्षांची लागवड व संगोपन केले. वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये संस्था व व्यक्तींनी यामध्ये श्रमदानासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नाशिक महापालिकेने येथील वृक्षांची गणना केली असता ४५० हून अधिक प्रजातींची सुमारे साडेचार लाख वृक्ष येथे आढळून आले. घनदाट वृक्षराजींंमुळे कर्बवायूंचे प्रदुषण कमी होण्यासह हे जंगल नाशिक शहरासाठी शुद्ध हवा पुरणारी 'प्राणवायू फॅक्टरी' झाली आहेत.
चिंचाळे पांजरापोळमुळे नाशिकच्या पश्चिम भागातील सारोळं येथील स्टोन क्रेशर तसेच डांबर प्रकल्पामुळे निर्माण हाेणारी धुळ, प्रदुषण यापासून शहराचे संरक्षण करणारी जैविक भिंतीची कवच उभे राहले आहे. त्यामुळे नाशिक शहराचे मातीयुक्त धुळ, प्रदुषणापासून नैसर्गिक संरक्षण होत आहे. येथील समृद्ध जीव तसेच वनसंपदा पाहण्यासाठी अभ्यासण्यासाठी संशोधक, निसर्गप्रेमी, फोटोग्राफर, स्वयंसेवी संस्था याच्यासाठी हे नंदनवन ठरले आहे.
मधमाशांचे पर्यावरणातील स्थान महत्वपूर्ण असते. संस्थेचा मधुमक्षिका पालन प्रकल्पही यशस्वी ठरला आहे. यामुळे परागीकरणास मदत होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो. परागीकरणामुळे फळे व धान्य उत्पादन वाढीसोबतच नैसर्गिक व उत्कृष्ट मधही मिळतो. येथील जलसंधारणाची कामे व वृक्षलागवडीमुळे विविध प्रकारच्या प्राणी, सरपटणारे जीव व किटक, फुलपाखरे, पक्षांसाठी हक्काचा निवारा मिळाला आहेे. यातून समृद्ध जैवविविधता विकसित झाली आहे. ती जोपासली जावी म्हणून संस्थेने स्वतःचे मालकीचे काही क्षेत्र निर्मनुष्य ठेवले आहे. तळ्यांमधील पाणी स्वच्छ राहावे यासाठी त्यांत मासे व बदक आणि राजहंस सारखे पक्षी देखील सांभाळले जातात. एकूणच वेगवेगळ्या तळ्यांमुळे हिरवळीने नटलेले, वन्य प्राणी व पक्ष्यांच्या अधिवासामुळे चुंचाळे पांजरापोळ एक अद्भुत आणि मनोहारी निसर्ग भेटीची पर्वणीच ठरली आहे.
गोशाळेतीळ शेणापासून 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती'. विद्युत निर्मिती, वाहनांसाठी इंधन. यामुळे विजेचीही बचत पर्यावरण जतनास मदत.
सौरऊर्जेपासून विदुयतनिर्मिती, संस्थेच्या इलेक्ट्रिक वाहने त्यावर चालतील. दैनंदिन कामात इलेक्ट्रिक वाहनांचा वापरात वाढ
सौरऊर्जेसाठी प्रकल्प आहेच. भविष्यात सौरऊर्जेवरील स्वयंचलित पथदिवे. सुरक्षिततेच्या कारणास्तव सुरक्षा कॅमेरे बसविणे.
गोपालन करताना देशी गायींच्या वंशाचा विकास करत आहेच यात प्रमाणित सेंद्रिय पद्धतीमध्ये बसत असल्यास, एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्तम वंशाच्या देशी गायींची पैदास करणे.
गौशाळा : भारतीय वंशाच्या डांगी आणि अन्य गाईंची आजीवन काळजी घेतली जाते.
२७ पर्जन जलसंधारण तलाव(पाणवठे), भव्य गांडूळ खत प्रकल्प.
परिणामकारक जलसिचंनासाठी तुषार, ठिबक सिंचन पद्धती.
वेगवेगळ्या प्रजातींचे ४.५ लाख वृक्ष प्रजाती. सरपटणारे प्राणी, मासे व इतर जलचर जीव.
चारा पिके व फळबागांची (आंबा, पेरू,सिताफळ, चिकू, जांभूळ, चिंच इत्यादी )सेंद्रिय शेती
पक्षांच्या ८० हून अधिक प्रजाती(पानपक्षी, रानपक्षी, दलदलीत राहणारे पक्षी)
मोरांचे नंदनवन ३०० हून अधिक मोर; नैर्सगिक अधिकास निर्मिती.
४५०किलोव्हॅट क्षमतेचा साैर ऊर्जा प्रकल्प -अक्षय उर्जा संसाधन.
मधमाशी पालन प्रकल्प(५० हून अधिक मधमाशी पेटी) परागीकरणासाठी उपयुक्त प्रकल्प.
शंखंपुष्पी, मुसळी, शतावरी, आडुळसा, जायफळ यांसह मौल्यवान वनाऔषधीं, भाजीपाल, फुलांची बाग अंतर्गत रोपवाटीका, हरितगृह.
पर्यटकांना वनाची रेपट मारण्यासाठी तसेच शेतीसाठी ट्रॅक्टर. सेल्फी पॉईंट, पर्यावरपूरक निसर्गस्नेही मिटींग पाईंट
संस्थेच्या आवारात बारा वर्षाखालील बालकांना दररोज सेंद्रिय गायीचे दूध समोरच पिण्याच्या अटीवर दिले जाते. बालकांच्या पोषणासाठी उपयोगी ठरते. बालकांना केळी, भत्ता व पारले ग्लुकोज बिस्किटे यांचे मोफत वाटप गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते शहरातील शाळा, महाविद्यालये, दवाखाने, वृद्धाश्रम व, अनाथाश्रम या सारख्या संस्थांना सवलतीच्या दरात दररोज प्रमाणित सेंद्रिय दुधाचा पुरवठा केला जातो. अनाथाश्रम, वृद्धाश्रम या सारख्या संस्थांमध्ये वेळोवेळी संस्था प्रमाणित सेंद्रिय आंबे व प्रमाणित सेंद्रिय दुधापासून तयार केलेल्या खीर चे वाटप यासारखे उपक्रम कोविड महामारी काळात संस्थेने स्वखर्चाने पोलीस, शासकीय कर्मचारी, अनाथाश्रम, शासकीय संस्थांमध्ये तसेच रस्त्यांवर गरजू, गरीब लोकांना एकूण १, ४५००० लिटर प्रमाणित सेंद्रिय ताकाचे वाटप. गरीब शेतकरी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिरे गरीब व आदिवासी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अटी शर्तींसह मोफत गोवंश वाटप. 'शेतकरी ते ग्राहक' या शासनाच्या संत सावतामाळी योजनेतील बाजारासाठी स्व-मालकीची जागा उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या व निरुपयोगी गायींचा संस्थेकडून आजीवन सांभाळ.
गोवंश सेवा, निसर्ग सरंक्षणासह वन्यजीवांचेही संवर्धन करणारा हा धरतीवरचा स्वर्गच आहे. मुरमाड, बोडके रान ते हिरवीगार सृष्टी या बदलाचा साक्षीदार राहिलो आहे. निसर्ग निर्माण करायला अनेकांचे आयुष्य खर्ची जाते. मात्र तो क्षणात नष्ट करुन मानव पायावर कुऱ्हाड मारतोय. तिसरे महायुद्ध पाणी आणि शुद्ध हवेसाठी लढले जाणार आहे. इथली ही 'अॉक्सिजन फॅक्टरी' नाशिककरांना अखंड मोफत प्राणवायू देत आहे.जिभाऊ शिरसाठ, व्यवस्थापक, चुंचाळे पांजरापोळ.
चुंचाळे पांजरापाेळ जंगलात दुर्मीळ पक्षी, सस्तन, विविध प्रजातिंचे साप, नाग सरपटणारे प्राणी, जलचर जीवांचे नंदनवन आहे. रानमांजर, उदमांजर, रानपिंगळा हे आणि असेच जैव वैविध्य अभ्यासकांसाठी नंदनवन ठरले आहे. यापरिसरात मुक्त प्रवेश नसल्याने पशुपक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास ठरला आहे. ही समृद्धी नाशिकसह राज्याचे वारसाच आहे.अभिजीत महाले, बिबळ्या रेस्क्यू टीम प्रमुख, प्राणी अभ्यासक.
चुंचाळे शिवारातील वनराई, जंगल हे मानव कष्टातून निसर्ग कसा निर्माण करु शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण आणि निसर्गस्नेही, सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या फळांचे आगार आहे. हे जंगल, गोशाळा नाशिकचेच नव्हे तर राष्ट्राचे वैभव ठरावी. जंगल जीवविविधता नाशिकला प्राणवायू पुरवत आहेत.प्रा. सचिन काकडे, रिना काकडे, संस्थापक 'स्वप्नपूर्ती'
पांजरापोळला पर्यटन विभागाकडून कृषी पर्यटन केंद्राचा दर्जा देण्यात आला. निसर्ग व कृषी पर्यटनाचे हे आदर्श स्थान झाले आहे. अन्य संस्थांनी पांजरापोळचा आदर्श घ्यावा. ओसाड, मुरमाड, रुक्ष, बोडक्या दगडांवर वनराईतून कसे नंदनवन फुले शकते आणि त्यातून पर्यटकांनाही कसे आकर्षित केेले जाता येते याचे देखणे, मूर्तीमंत उदाहरण म्हणूनही पांजरापोळ येथील या कार्यकडे बघता येईल.जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटन विभाग, नाशिक.