नाशिक : पुढारी प्रतिनिधी
नाशिक शहराच्या महत्त्वाकांक्षी बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, आतापर्यंत १६ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १२० कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील पायाभूत सुविधा विकास आणि औद्योगिक वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाह्य रिंगरोड प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली आहे. महसूल विभाग, भूमापन विभाग आणि प्रकल्पाशी संबंधित यंत्रणा संयुक्तपणे गावनिहाय मोजणी, दस्तऐवज पडताळणी आणि मोबदला निश्चितीची प्रक्रिया राबवत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमीन हस्तांतरासाठी सहमती दर्शविल्याने प्रक्रिया अधिक वेगाने होत असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून बाजारभाव, रेडीरेकनर दर आणि प्रचलित नियमांनुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येत आहे.
मोबदल्याची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात येत असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात आहे. रिंगरोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून वळवणे शक्य होणार असून, मुंबई-आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि औद्योगिक क्षेत्रांना थेट जोडणी मिळणार आहे. यामुळे शहरातील वाहतूकीचा ताण कमी होऊन वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पाला मिळणार वेग
ज्या भागांतील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी प्राथमिक तांत्रिक कामे, सीमांकन आणि रस्त्याच्या आराखड्याशी संबंधित प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित जमिनीचे संपादन लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आगामी काळात प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.