नाशिक : कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नागपूर येथे विधीमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा हे येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. मात्र, कांद्यावरील निर्यात शुल्कामुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान हे कांद्याच्या शेतीवर अवलंबून असून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आला आहे.
या शुल्कामुळे परदेशी बाजारपेठांमध्येही कांद्याची मागणी कमी होत आहे आणि निर्यातदारांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, स्थानिक बाजारात कांद्याच्या किमतीत मोठी घसरण होत असून साध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर हा 1000 ते 2000 रुपयांपर्यंत खाली आला आहे. यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा सुटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यात यावे. ज्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आपण केंद्र सरकारकडे विनंती करून कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क रद्द करण्यासाठी शिफारस करावी अशी मागणी भुसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे..