त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोटंबी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बेहडपाडा शिवारातील उन्हाळ्यात दुरुस्त करण्यात आलेल्या पाझर तलावाची भिंत पावसाने ढासळली. पाझर तलावाच्या मुख्य संरक्षक भिंतीतील भराव वाहून गेल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
हरसूलजवळील कोटंबी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बेहडपाडा येथे मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील पाझर तलाव दुरुस्तीचे काम या उन्हाळ्यात करण्यात आले. मात्र, कामाचा दर्जा सुमार असल्याचे पहिल्याच पावसात निष्पन्न झाले आहे. दोन-तीन दिवसांच्या जोरदार पावसामुळे पाझर तलावाची मुख्य भिंत कोसळली. पाझर तलावाच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहता बंधारा फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. या भरावाबरोबर ठेकेदारांचे बांधकाम साहित्य वाहून गेले आहेत.
दुर्गम भागात जलसंधारणाची कामे करताना शासनाचा निधी खर्च होतो, मात्र कामाचा दर्जा राखला जात नाही. पाझर तलाव बांधला, तेव्हा त्यात पाणी थांबत नव्हते, म्हणून दुरुस्तीचे काम काढले. आता ते देखील वाहून गेले आहे. एकूणच शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. याबाबत संबंधित यंत्रणा मृद व जलसंधारण विभागाने लक्ष घातलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुरुस्त करण्यात आलेल्या या पाझर तलावाची मुख्य भिंत कोसळत असेल, तर केलेले दुरुस्तीचे काम निकृष्ट होते, हे उघड होत आहे. विशेष म्हणजे पाणीपातळीत वाढ व्हावी यासाठी पुढील बाजूकडील भराव काढलेला नाही. पाझर तलावात मोठमोठे दगड तसेच आहेत. हरसूल भागात अनेक ठिकाणी लाखो रुपयांची विकासकामे मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत करण्यात आली असून, यात बेहडपाडा येथील पाझर तलावाचा समावेश आहे. मात्र, कुठल्याच ठिकाणी कामासंबंधी फलक पाहावयास मिळत नाही. तसेच दर्जेदार कामांचा अभाव दिसून येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
बेहडपाडा येथील पाझर तलावाच्या मुख्य संरक्षक भिंतीचा भराव कोसळला आहे. त्यामुळे पाझर तलाव धोकादायक अवस्थेत आहे. दुरुस्तीचे काम निकृष्ट झाले असून, ठेकेदार आणि अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडत आहे. पाझर तलावाच्या कामासंदर्भात वरिष्ठांना निवेदन देऊन आंदोलन करणार आहे.मिथुन राऊत, युवासेना उपजिल्हाप्रमुख (शिंदे गट)