नाशिक

Nashik News | शिधापत्रिकाधारकांना सर्व्हर डाऊन चा फटका

पुढारी वृत्तसेवा

निफाड : महाराष्ट्र शासन सार्वजनिक पुरवठा विभागाकडून राज्यातील शिधापत्रिका धारक नागरिकांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ हा शिधा पुरविण्यात येत असतो. निफाड शहर तसेच निफाडलगत असलेली जळगाव, काथरगाव, कुरुडगाव, सूंदरपुर आणि रसलपूर परिसरात राहणारी सुमारे पाच हजार कुटुंबे ही निफाड शहरातील दोन रेशन धान्य विक्री केंद्रांवर अवलंबून आहेत. (Server Down)

शासनाच्या पुरवठा विभागाकडील संगणक प्रणालीत निर्माण झालेल्या (Server Down) दोषामुळे हजारो शिधापत्रिका धारकांना जुलै महिन्यातील धान्य मिळण्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे. जुलै महिना संपण्यासाठी आता जेमतेम दोन-तीन दिवसांचा वेळ शिल्लक राहिलेला असून नागरिकांना त्यांच्या हिश्श्याचे रेशन धान्य व इतर वस्तूंचा पुरवठा होऊ शकलेला नाही. नागरिकांना रेशन दुकानातून मिळणारे धान्य या महिन्यात मिळेल की नाही असे झाले आहे.

याबाबत निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडून तसेच संबंधित पुरवठादार आणि शिधापत्रिका धारक ग्राहक यांच्याकडून माहिती घेतली असता सार्वजनिक पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन प्रक्रिया ही राज्य पुरवठा विभागाच्या संगणक प्रणालीतील सर्व्हर दोषामुळे 20 जुलैपासून बंद पडलेली आहे. रेशन दुकानातून शिधा घेण्यासाठी शिधापत्रिका धारकाचा अंगठ्याचा ठसा हा ठसायंत्रात (थंब स्कॅनर) उमटला पाहिजे असतो. ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे पैसे मिळाल्याची पावती निघू शकत नाही, पर्यायाने शिधापत्रिकाधारकांना शिधा मिळू शकत नाही. त्या तांत्रिक अडचणी मुळे धान्य वाटप करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

शिधापत्रिका धारकांकडून शासन केवायसी करण्यासाठी वेळोवेळी आधार कार्ड, फोटो, बोटांचे ठसे बायोमेट्रिक ओळख अशा विविध गोष्टींची मागणी करत असते. ही मोहीम देखील सध्या सुरू आहे मात्र या मोहिमेला देखील संगणक प्रणालीतील सर्व्हर बंद पडण्याचा फटका सोसावा लागत आहे. सर्वसामान्य लोकांना आपली दैनंदिन सर्व कामे सोडून तासनतास रेशन दुकानापुढे रांग लावून उभे राहावे लागते. निफाड शहरातील रेशन दुकान हे पाच पाच किलोमीटर दूर असलेल्या खेडेगावातील लोकांसाठी असून अडचण, नसून खोळंबा असे झाले आहे. ग्रामीण भागातील आणि वाहतुकीची सुविधा नसलेल्या भागातील नागरिकांना प्रकरण हेलपाटा मारण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे.

SCROLL FOR NEXT