मनमाड (नाशिक) : सकाळची वेळ... अचानक एक प्रचंड मोठा आवाज...स्फोट झाल्यासारखा! इतका जबरदस्त की सुमारे ४ ते ५ किलोमीटर परिसरातील जमिनीला हादरा बसला. त्यामुळे मनमाड शहरासह अंकाई किल्ला परिसर, गावांमध्ये क्षणार्धात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
भारत-पाकिस्तान यांच्यात सध्या युद्धजन्य तणाव असताना, अशा अचानक स्फोटासारख्या आवाजाने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेकांनी घाबरून थेट पोलिस ठाण्यात फोन केले. पोलिसांपासून ते शासकीय यंत्रणांपर्यंत सर्वांची एकच धावपळ सुरू झाली. हा आवाज नक्की कशाचा?
आवाजाचा स्त्रोत अंकाई किल्ला परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मनमाड आणि येवला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसर पिंजून काढण्यात आला. खडी क्रेशरवरही तपासणी झाली. मात्र, कोणीही कोणताही स्फोट झाल्याचे मान्य केले नाही. ग्रामस्थांनाही आवाज ऐकू आला होता, पण तो नेमका कशाचा होता हे सांगता आले नाही.
घटनानंतर सोशल मीडियावर आणि स्थानिक चर्चांमध्ये अनेक अंदाज बांधले जाऊ लागले.
कोणी म्हणाले विहिरीसाठी ब्लास्टिंग केलं असावं.
कोणी म्हणाले क्रेशरमध्ये डोंगर फोडण्यासाठी स्फोट झाला असावा.
तर कोणी आकाशातून रॉकेट गेलं असावं, अशाही चर्चा रंगल्या.
मात्र, अद्याप कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही.
पोलिसांकडून चौकशी सुरू असून, आवाजाचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही प्रकारची मोठी घटना घडलेली नाही, नागरिकांनी घाबरू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.