पंचवटी : पेठ रोडवरील फुलेनगर, गौंडवाडीत पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर उभारलेल्या आवास योजनेतील घरकुलाच्या छताचा स्लॅब कोसळून घरात झोपलेले दोघे भाऊ, बहीण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.१) मध्यरात्रीच्या सुमाराला घडली. या घटनेनंतर केवळ पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, चोवीस तास उलटून गेल्यानंतरही मनपा प्रशासन अथवा संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहचले नसल्याचा आरोप घरकुल आवास योजनेतील नागरिकांनी केला आहे.
सन १९९२ ते १९९७ या पंच वार्षिकमध्ये मनपाच्या वतीने फुलेनगरामधील गौंडवाडीत जुनी घरे काढून नागरिकांना राहण्यासाठी दुमजली इमारत बांधण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी डागडुजी न झाल्याने या इमारती जीर्ण होत गेल्या आहेत. याबाबत नागरिकांनी वारंवार मनपाकडे मागणी करूनही इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच दुर्घटना घडत आहे. याचा प्रत्यय सोमवारी (दि .१) आला. संध्या कालिया शेडमाके (२६) व मन्नू शेडमाके (२७) हे यातीलच एका घरकुलात वास्तव्यास होते. मध्यरात्री घराच्या छताचा स्लॅब त्यांच्या अंगावर पडल्याने डोक्याला, खांद्याला जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी याच गौंडवाडीत घरकुल योजनेच्या पहिल्या मजल्यावरचा गॅलरीचा काही भाग कोसळून पाच वर्षाचा बालक जखमी झाल्याची घटना घडली होती. याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाने या ठिकाणी नवीन घरकुल योजना करावी, अशी मागणी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, माजी नगरसेविका सरिता सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे दिली होती. मात्र, याकडे प्रशासनाने कानाडोळा केला.
इमारत धोकेदायक असल्याने इमारतीतील नागरिकांना पालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापर्यंत पर्यायी जागा उपलब्ध करून दयावी व पुन्हा नव्याने परिसरात घरकुल योजना राबवावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केले असल्याचे माहिती माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, शंकर हिरे यांनी दिली.