नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात कांद्याचे दर घसरत असल्याने आक्रमक झालेल्या कांदा शेतकरी, प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. आम्हाला न्याय द्या, असा बॅनर झळकवत जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नांची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांदा प्रश्नांवर बैठक घेऊन यात, तोडगा काढण्याची ग्वाही उद्घाटनप्रसंगी दिली.
विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यासाठी येत असताना मुख्यमंत्री यांचा गंगापूर रोडवरील मल्हारखान परिसरात प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ताफा संमेलनस्थळी पोहोचला. संमेलनस्थळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, खासदार शोभा बच्छाव आदींनी कांदाप्रश्नी लक्ष घालण्याची त्यांच्याकडे मागणी केली.
माझी गाडी अडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, गाडी आडवायचा तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही. परंतु हा प्रश्न गंभीर आहे. मी कांद्याबाबत बैठक घेऊन तोडगा काढेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरवर्षी कांदा प्रश्नावर शेतकरी अडचणीत सापडल्यानंतर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलेलो आहे. आताही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.