नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी चेंबरच्या शंभरव्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सन २०२७ मध्ये शतकपूर्ती वर्ष साजरे होत असल्याने हा ऐतिहासिक सोहळा महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांनी संयुक्तरीत्या आयोजित करावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. तसेच राज्य सरकारने दुकाने व इतर आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याचे आदेश दिल्याने, शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी शिष्टमंडळाने नमुद केले की, शतकपूर्तीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यात प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंट समित्या, कृषीविकास, उद्योगवृद्धी आणि व्यापारवाढीसाठी उपलब्ध असलेल्या योजना यांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्यातील विविध विभागांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच, राज्य शासनाने व्यापाऱ्यांना व दुकानदारांना २४ तास दुकाने सुरु ठेवण्याची दिलेली परवानगी हा दूरदृष्टीपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची दखल घेत नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र माणगावे यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी चेंबरच्या शतकपूर्ती सोहळ्याला पाठिंबा दर्शविला असून राज्यातील उद्योग-व्यापार वृद्धीसाठी शासन चेंबरसोबत राहील, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळामध्ये आमदार राहुल आवाडे, चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, संजय सोनवणे, शंकर शिंदे, श्रीकृष्ण परब तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ओमप्रकाश अग्रवाल आणि वेदांशू पाटील आदी उपस्थित होते.