चांदवड : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा 4.0’ अभियानात चांदवड नगरपरिषदेला राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष वैभव बागुल यांनी दिली.
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत स्वच्छता, हरित उपक्रम, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन करण्यात येते. चांदवड नगरपरिषदेकडून गेल्या वर्षभरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. वृक्षारोपण मोहिमा, प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी, ओला-सुका कचरा विलगीकरण, सांडपाणी व्यवस्थापन तसेच जनजागृती अभियान यामुळे शहराचा पर्यावरणीय दर्जा उंचावला आहे.
नगरपरिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हे यश शक्य झाले. शहर स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने चांदवडने उचललेली ही पावले राज्यासाठी आदर्श ठरत आहेत.
या यशाबद्दल नगरपरिषद पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.