नाशिक : मविप्र कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भविष्यात जलसंधारणाची कामे केली जाणार असून, शेतीपयोगी नवनवीन प्रयोग राबविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातर्फे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुतळ्यांना व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ॲड. ठाकरे यांनी कै. वसंतराव नाईक यांचा जीवनपट व त्यांचे कार्य विशद केले. प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी प्रास्ताविक केले.
कृषी दिनानिमित्त ॲड. ठाकरे यांच्या हस्ते संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, डॉ. विलास देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, डॉ. के. एस. शिंदे व कृषी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. पंकजसिंह चौहाण यांनी सूत्रसंचालन केले.
कृषिदिनाचे औचित्य साधून कृषी महाविद्यालय व गंगापूर रोड परिसरात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, सेवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी फलकांद्वारे कृषिदिनाचे महत्त्व सांगून वृक्षलागवडीचा संदेश दिला. फलकांवरील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.