नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, उत्सव काळात शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि सुरक्षेची यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व विभागांना कडक निर्देश दिले आहेत. गणेश मंडळांच्या मंडप परवानग्यांसाठी 'एक खिडकी' योजना प्रभावीपणे राबवण्यासह मिरवणूक आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त खत्री यांनी मंगळवारी (दि. ९) सर्व खातेप्रमुखांची बैठक घेत सूचना दिल्या. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी महापालिकेने विभागनिहाय तयारी सुरू केली आहे. मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या मिळविताना मंडळांना अडचणी येऊ नयेत, यासाठी 'एक खिडकी' योजनेतून अर्जांचा दैनंदिन आढावा घेऊन प्रलंबित अर्जांचा तत्काळ निपटारा करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठा तसेच गणेश विसर्जन व मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. रस्त्यांसह दुभाजक आणि वाहतूक बेटांची स्वच्छता करण्यावरही भर दिला आहे.
गणेशोत्सवात मिरवणुका आणि नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मुख्य रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविणार आहे. विनापरवाना होर्डिंग्स, जाहिरात फलक, झेंडे व पताका हटविण्याचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठांमध्ये दिवसातून दोन वेळा झाडलोट आणि कचरा संकलन केले जाणार आहे. निर्माल्य संकलनासाठी विविध ठिकाणी निर्माल्य कलश, तर गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंड उभारणार आहेत. मूर्ती संकलनाचीही स्वतंत्र व्यवस्था नियोजन आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पशुसंवर्धन विभागाला विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. उत्सव काळात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभागाने तत्काळ कारवाईच्या सूचना आहेत.
गणेशोत्सव काळात विभागीय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून कारभार न करता दररोज प्रत्यक्ष प्रभागात पाहणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. मनीषा खत्री यांनी दिले आहेत. स्वच्छता, पथदिवे, अतिक्रमण तसेच नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
गणेशोत्सव काळात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाला विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा ठेवण्यासह २४ तास अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवणार आहे. तसेच अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणाही २४ तास सज्ज ठेवणार आहे.