नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या अग्निशमन भरती प्रक्रियेत परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील शेकडो उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई या शासन मान्यताप्राप्त संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे या उमेदवारांना अपात्र करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा उमेदवारांनी दिला आहे.
तब्बल २४ वर्षांनंतर महापालिकेत तांत्रिक संवर्गातील ११४ तर अग्निशमन विभागातील फायरमन व वाहनचालकांच्या १८६ पदांच्या भरतीसाठी टीसीएसमार्फत प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीसाठी परीक्षा देखील घेण्यात आली.
परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली असून कागदपत्रांची छाननी केली जात आहे.
दरम्यान अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, परमानंद कॉलेज, सह्याद्री कॉलेज, ग्लोबल कॉलेजकडून अनेक उमेदवारांनी फायरमनचा अभ्यासक्रम पूर्ण करत या भरतीत सहभाग घेतला होता. परंतु, या संस्थांकडून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व उमेदवारांना अपात्र करण्यात आले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई ही एकमेव शासन मान्यताप्राप्त संस्था आहे.
नाशिकच्या भूमिपुत्रांवर हा अन्याय आहे. 66 संबंधित संस्थांकडून अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार अपात्र होते तर महापालिकेने ते आधीच का जाहीर केले नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अपात्र घोषित करणे अन्यायकारक आहे.- अजय बोरस्ते, उपनेते तथा गटनेते, शिवसेना, शिंदे गट
फायरमन भरती प्रक्रियेत भूमिपूत्रांवर अन्याय होऊ नये. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत पात्रतेची संधी द्यावी. अन्यथा राष्ट्रवादीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल.- रंजन ठाकरे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अपात्रतेचा निर्णय हा भूमिपुत्रांची शुद्धय 66 फसवणूक आहे. महापालिकेला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील प्रशिक्षणार्थी चालतात मग भरतीसाठी का नको? निर्णय मागे न घेतल्यास उबाठा आंदोलन छेडणार. - केशव पोरजे, गटनेते, शिवसेना (उबाठा)