आडगाव : पुढारी वृत्तसेवा
सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून द्वारका ते जत्रा मार्गावरील अमृतधाम, बळी महाराज मंदिर व जत्रा चौफुली परिसरात वाहनधारकांना तळपत्या उन्हात तासन्तास एकाच ठिकाणी उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत असून, प्रशासनाकडून मात्र तात्पुरत्या उपाययोजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. मुंबई- आग्रा महामार्गावरील अमृतधाम, बळी महाराज मंदिर व जत्रा चौफुली परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली आहे.
त्यात या महामार्गालगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर चौफुली ते नांदूर नाका या परिसरात लॉन्स असल्यामुळे या टप्प्यात कायम गर्दी असते. सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या तिन्ही चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
शनिवारी (दि. ७) दुपारच्या सुमारास अमृतधाम, हनुमाननगर आणि जत्रा हॉटेल चौफुली येथेही वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने संपूर्ण परिसरात चक्काजामसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलिसांना अक्षरशः मोठी कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे १२ वर्षांनंतर दुसरा कुंभमेळा उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाही, वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यावश्यक असलेले ट्रॅफिक सिग्नल अद्याप प्रशासनाने बसविलेले नाही.
वाहतूक पोलिस, महापालिका, स्मार्ट सिटी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या परवानगीच्या जंजाळात हे काम अडकले असल्याची माहिती आहे. गेल्या दोन वर्षांत बळी महाराज मंदिर चौक व त्याला लागून असलेल्या चारही रस्त्यांवर घडलेल्या विविध अपघातांमध्ये तब्बल २२ जणांचा मृत्यू, तर शेकडो वाहनधारक व पादचारी जखमी झाले आहेत.
सर्व चौफुल्या बनल्या 'ब्लॅक स्पॉट'
सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी चार वाहतूक पोलिस तैनात असतानाही बेशिस्त वाहनचालक, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावरील वर्दळ आणि अपुरी वाहतूक यंत्रणा यांमुळे हे चौक 'ब्लॅक स्पॉट' झाले आहेत. हे चौक अजून किती बळी घेणार? असा सवाल उपस्थित करीत तातडीने ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी करीत ट्रॅफिक नियंत्रण करावे अशी मागणी नाशिककर करीत आहेत.
आपण महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. आठ दिवसांच्या आत प्रत्येक चौफुलीच्या चारही बाजूंनी प्लास्टिकचे स्पीड ब्रेकर टाकून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.-नामदेव शिंदे, नगरसेवक