नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर उभे राहिलेले बंडखोरीचे आव्हान अखेर कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी (दि.७) झालेल्या चर्चेनंतर सोमवारी (दि. ८) उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला प्रसाद हिरेही उपस्थित होते. बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर हिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. याबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महायुतीतील दोन्ही बंडखोर उमेदवार माघार घेतील, असा विश्वास सुरुवातीपासून होता.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने प्रसाद हिरे यांना अधिकृतरीत्या अर्ज मागे घेता आला नसला, तरी त्यांनी निवडणुकीतून बाजूला होत नरेंद्र दराडे यांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. महाजन यांनी सांगितले की, नाशिकमधील प्रश्न निकाली निघाल्यानंतर जळगावमधील परिस्थितीही लवकरच स्पष्ट होईल. गोकुळ गिते यांच्याशीही चर्चा सुरू असून, त्याबाबत सायंकाळपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. राज्यातील १७ पैकी सर्व १७जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जळगावमधील बंडखोरीकडे लक्ष
नाशिकमधील घडामोडींनंतर आता सर्वांचे लक्ष जळगाव विधान परिषद निवडणुकीकडे लागले आहे. भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली असली, तरी शिंदे गटाशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांच्या माघारीसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू असले, तरी त्यांनी अद्याप माघार घेण्यास नकार दिला आहे.
गोकुळ गितेंबाबतही सकारात्मक निर्णय
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमधील तिढा सुटल्यामुळे जळगावमधील बंडखोरीचाही मार्ग लवकरच मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, नाशिकमधील दुसरे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते हे सध्या मतदारांशी संपर्क साधत असून, त्यांच्याशीही महायुतीच्या नेत्यांचा संवाद सुरू आहे. लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.