नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुंभनगरी नाशिकच्या महापौर-उपमहापौरपदासाठी शुक्रवारी (दि.६) पार पडलेल्या विशेष सभेत भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची १७ व्या महापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपचाच महापौर होणार हे स्पष्ट होते.
अखेर विरोधी उमेदवाराने माघार घेतल्यानंतर आहेर-आडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या निवडीमुळे तब्बल २० वर्षांनंतर नाशिक महापौरपद मराठा समाजाकडे आले आहे. दरम्यान, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या.
भाजपचे उमेदवार मच्छिंद्र सानप, तसेच शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी दाखल केलेले प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या विलास शिंदे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे. परिणामी, विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक महापालिकेत सत्तेत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मुंबई पातळीवर झालेल्या चर्चेनंतर उपमहापौरपद शिंदे गटाला देण्यावर सहमती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसारच इतर उमेदवारांनी माघार घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महापौर-उपमहापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता विशेष सभा सुरू झाली.
ठरलेल्या वेळापत्रकानुसार छाननी, माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापौरपदाची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यानंतर उपमहापौरपदाची प्रक्रिया राबविण्यात आली.
भाजपने १२२ पैकी ७२ जागा जिंकत नाशिक महापालिकेवर सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवली असून, या सत्ताकारणात शिवसेना (शिंदे गट) ला सहभागी करून घेत उपमहापौरपद देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेतील सत्तासूत्रे भाजप-शिंदे गटाच्या समन्वयातून चालणार असल्याचे संकेत मिळत आहेत.