नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गरजू व विवाहासाठी इच्छुक मुलांना हेरून विवाह लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिला टोळीचा मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार महिलांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या टोळीने अनेकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील रहिवासी बळवंत पाटील (४२) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीसह त्यांच्या गावातील देवीदास पाटील व नीलेश पाटील यांना आरोपींनी विवाह जुळवून देण्याचे आमिष दाखवले होते. डिसेंबरपासून ते ३० मार्चपर्यंत नाशिकमधील क्रांतीनगर झोपडपट्टी, उंटवाडी परिसरात आरोपींनी रोख स्वरूपात ५ लाख २८ हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी गीता कोसरे, संगीता मोरे, जयश्री मोहिते, पुष्पा रामटेके, जयश्री शिंगाडे, प्राची भालेराव, नम्रता भालेराव, सोनाली वाकडे आणि खंडू सोनवणे यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करत पोलिसांनी गीता नरेश कोसरे (रा. शिंदे, ता. नाशिक), संगीता भीमाजी मोरे (रा. वाडीव-हे, ता. इगतपुरी) आणि जयश्री संजय शिंगाडे (रा. उंटवाडी, नाशिक) यांना १७ मे रोजी अटक केली.
त्यानंतर पुष्पा राकेश रामटेके हीस १८ मे रोजी अटक केली. सध्या सर्व आरोपींना न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात काही रक्कम हस्तगत करण्यात आली असून, उर्वरित रक्कम जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत सहायक पोलिस उपनिरीक्षक देवीदास गायकवाड तपास करत आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक समद बेग, रोहिदास सोनार, देवीदास गायकवाड, दीपक जगताप, गणेश बोरगुडे, आकाश सोनवणे, विशाल पाठक, समीर शेख यांनी पार पाडली.